अकोला ः विदर्भातील कपाशी पिकावर बोंड अळीचा वाढलेला प्रकोप भयंकर असून, चिंतेचा बनला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले. अकोला तालुक्यातील मासा गावात त्यांनी भेट देऊन कपाशीच्या पिकाची पाहणी केली.
या मासा गावात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बीटी कपाशी लावली असून, त्यात एकरी दोन क्विंटलही कापूस झालेला नाही. याबाबत श्री. सिन्हा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या वेळी सिन्हा यांच्यासोबत शेतकरी जागर मंचाचे दिलीप मोहोड, केदार बकाल, रवी अरबट, राजू मंगळे, मनसेचे अकोला तालुका अध्यक्ष सतीश फाले, पोलिस पाटील अंगतराव फाले, बबनराव फाले, ओम प्रकाश फाले, शरद फाले, संजय सहारे, वैभव फाले, प्रशांत फाले अादी उपस्थित होते.
या हंगामात बोंड अळीने कपाशीचे ७० टक्क्यांवर नुकसान झाले असून, यंत्रणांनी सर्वेक्षण करायला हवे होते. मात्र मासा गावात कुणी भेट दिली नसल्याची बाब शेतकऱ्यांनी सिन्हा यांच्या निदर्शनास अाणून दिली.