वऱ्हाडात गारपिटीने ४० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

वऱ्हाडात गारपिटीने ४० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

अकोला : वऱ्हाडात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात अाहे. रब्बीतील गहू, हरभरा, बीजोत्पादन कांदा, भाजीपाला, संत्रा, केळी, द्राक्ष या पिकांचे अतोनात नुकसान झाले अाहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पंचनामा करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर कृषी विभागाने तातडीने नजरअंदाज पंचनामे केले अाहेत.  गारपीट व अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला, द्राक्ष, केळी, अांबे या फळबागांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात नुकसानाचे क्षेत्र ४ हजार ३६०  हजारांपर्यंत तर वाशीममध्ये पाच हजार हेक्टरपर्यंत नुकसानीचे क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. प्रशासन सध्या अाकड्यांची जुळवाजुळव करीत अाहे.    बुलडाणा जिल्ह्यात सुमारे पावणेचारशे गावे या अापत्तीत सापडली. वाशीम जिल्ह्यात रिसोड व मालेगाव तालुक्यांतील २५ गावांमध्ये धुवांधार गारपीट झाली. अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट, अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात हरभरा पिकाचे सर्वाधिक पावणेचार हजार हेक्टरवर नुकसान झाले. वीज पडून युवती ठार रविवारी (ता. ११) मोताळा तालुक्यातील गिरोली येथील निकीता गणेश राठोड (वय १६) ही कापूस वेचत असताना वीज पडल्याने मृत्यूमुखी पाडली. तर या घटनेत तिची बहीण नेहा ही जखमी झालेली अाहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही   कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी (ता. १२) सकाळी बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून प्रशासनाने तातडीने माहिती गोळा करण्याची सूचना केली. शेतकऱ्यांना एनडीआरएफ व विम्यातून मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी फुंडकर म्हणाले, राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह इतर काही भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय नुकसान झालेली आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नसेल त्यांना नैसर्गिक आपत्तीतून मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून, त्यांच्या पाठिशी भक्कमपणे सरकार उभे राहील असेही त्यांनी सांगितले.  पक्ष, संघटनांकडून मदतीची मागणी दोन दिवसांतील गारपिटीच्या अापत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com