कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु ठेवण्याचा निर्णय

ऊस उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही तोडणीत अडथळे न आणण्याबाबत निर्णय घेतला. मात्र, याचा अर्थ हे आंदोलन थांबलेले नाही. एकरकमी एफआरपी मिळेपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूच राहील. कोणत्याही कारखान्याने एफआरपीची रक्कम तुकड्याने जमा करू नये, असेही आवाहन आम्ही केले आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. - भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर.
ok
ok

कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ऊसतोडणी चालू ठेवण्याचा निर्णय सोमवारी (ता.१४) दुपारी साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. 

ऊसतोडणी सुरू झाल्या असल्या, तरीही कोणत्याही कारखान्यांनी येथून पुढील काळात एफआरपीचे तुकडे करून रक्कम द्यायची नाही, असाही निर्णय या बैठकीत झाला. दुपारी एका संस्थेच्या कार्यालयात ही गोपनीय बैठक झाली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली ऊसतोडणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ऊसतोडणी बंद आहे. अनेक ठिकाणी ‘स्वभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कारखान्यांनी स्वत:हून तोडणी बंद केली. याचा विपरीत परिणाम ऊसगाळपावर होत असल्याने अखेर सोमवारी दुपारी जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.

कारखानदारांनी सरकारच्या मदतीशिवाय एफआरपीची रक्कम भविष्यात देणे अशक्‍य असल्याचे सांगितले, तर संघटनेचे कार्यकर्ते एकरकमी एफआरपीवर ठाम राहिले. पण, सध्याची स्थिती पाहता यावर तातडीने तोडगा निघणे अशक्‍य असल्याचे मत कारखानदारांसह शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. हंगाम थांबल्यास शेतकऱ्यांबरोबरच ऊस तोडणी कामगार व इतर घटकांचेही मोठे नुकसान होते. हा तोटा न भरून निघणारा असल्याने गाळप हंगाम सुरू ठेवण्याबाबत सर्वांनी एकमत नोंदविले.

दरम्यान, कारखान्यांनी येथून पुढे गाळप होणाऱ्या उसाची एफआरपीची रक्कम तुकड्याने न देता ती एकरकमीच द्यावी, असाही आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. अखेर तोडगा म्हणून कारखानदारांनी ही भूमिका मान्य केली. शासनाकडून अनुकूल निर्णय होईपर्यंत ऊसबिले प्रलंबित राहतील, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली. त्यालाही कार्यकर्त्यांनी मान्यता देऊन तोडगा काढला. यामुळे गेले दोन दिवस बंद असलेले उसाचे गाळप पुन्हा नियमितपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

साखरेचा विक्री दर २९०० रुपये असल्याने कारखान्यांना एफआरपी देणे अशक्‍य होत आहे. हा दर वाढवून घेण्यासाठी संघटनेनेदेखील कारखान्यांना मदत करावी, प्रसंगी एकत्रित शासनाकडे पाठपुरावा करूया, असाही निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी साखर आयुक्तांशी चर्चा केली. एक रकमी एफआरपी देता येत नसेल, तर कारखानदारांनी शिल्लक रकमेची साखर उत्पादकांना द्यावी, असे आदेश काढण्याची मागणी श्री. शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली. पण, ठरलेला मोर्चा निघणारच, असेही पुण्यात सांगितले. यामुळे सोमवारी दिवसभर तोडणी बंद राहिली.

दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. या बैठकीत गोंधळ होण्याच्या शक्‍यतेने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. पालकमंत्री येण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयावर जमलेल्या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे ‘स्वाभिमानी’च्या इतर कार्यकर्त्यांबरोबर कारखानदारांची चर्चा झाली. अखेर तोडणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी दिवसभर ऊसपट्ट्याने तणाव अनुभवला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com