पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा धोक्यात

माझ्याकडे एकूण ७० एकर डाळिंब, द्राक्षबाग आहे. आमच्याकडे कमी पाऊस झाल्यामुळे भीषण पाणीटंचाई आहे. कालव्याला पाणी आल्यामुळे शेततळे भरून ठेवले असून, फक्त झाडे जगविण्यासाठी चार ते पाच दिवसांतून ठिबकद्वारे पाणी देत आहे. शेततळ्यातील पाणी संपल्यावर फळबागा जगविण्यासाठी मोठे आव्हान उभे राहणार आहे. - अतुल शिंगाडे, शेतकरी, शेळगाव, इंदापूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी भागात आॅक्टोबरपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याचा फळबागांना मोठा फटका बसत असल्याने फळबागा धोक्यात आल्या असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कृषी विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक वर्षांपासून राज्य शासनाची रोजगार हमी योजना आणि केंद्र शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडकरण्यात येत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून रोजगार हमी योजना बंद करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला चालना देण्यात आली होती. याअंतर्गत दोन ते तीन वर्षांत पाच ते सहा हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड झाली आहे. एक वर्षापासून राबविण्यात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २८० शेतकऱ्यांनी १६२.९९ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी तीव्र पाणीटंचाई होती.

याकाळात जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक क्षेत्रावरील फळबागा जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. कृषी विभागापुढे याकाळात फळबागांना जीवदान देण्यासाठी तात्पुरत्या योग्य त्या उपाययोजना म्हणून शेततळ्यांचा पर्याय समोर आला होता. त्यामुळे कृषी विभागाच्या एनएमएच या अभियानाअंतर्गत शेततळ्यांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली. कृषी विभागाकडे मागील सात ते आठ वर्षांत सुमारे पाच हजारांहून अधिक शेततळी शेतकऱ्यांनी घेतल्याची नोंद आहे. त्यासाठी कृषी विभागाने अनुदानापोटी २० ते २५ कोटी रुपये खर्चही केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना शेततळ्यांचा आधार मिळाला. 

पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरी कोरड्या पडल्याने या शेततळ्यांकरिता पाणी मिळेनासे झाले आहे. काही ठिकाणी शेतकरी टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागा जगवू लागले आहेत. मात्र, त्यासाठी आर्थिक खर्च अधिक होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. याच भागात फळबागा व शेततळ्यांचे प्रमाण अधिक  आहे. 

अनेक शेतकरी विहिरीतील पाणी उचलून शेततळ्यात टाकून पाणी ठिबकद्वारे पाणी फळबागांना देतात. सध्या विहिरी कोरड्या पडल्या असल्याने शेततळ्यात टाकायला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच कालव्याद्वारे पाणी मिळण्याचीही शक्यता कमी झाल्याने फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले असून, कृषी विभागाने फळबागा जगविण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.   पुणे जिल्ह्यातील सर्वच भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्याचा फटका रब्बी पिकांसह उन्हाळी पिकांना बसला असून आता फळबागांनाही बसू लागला आहे. त्यासंदर्भात तालुकास्तरावरून फळबागांची माहिती मागविली आहे, अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. जे. पडघडमल यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com