सांगली : म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजनांचे वीजबिल भरण्यासाठी ५० कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी जाहीर केले. मात्र याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अद्याप निधीच आला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे म्हैसाळ योजना सुरू होणार नसल्याचे यावरून दिसते आहे. खासदार संजय पाटील आणि अधिकाऱ्यांच्या माहितीमधील मतभिन्नतेमुळे शासनाचे पैसे नक्की कुठे अडकले, असा सवालही शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
म्हैसाळ योजना तातडीने सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ५० कोटी रुपये मंजूर केले असून, त्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सहीदेखील झाल्याची माहिती खासदार पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपूर्वी दिली. मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले की, जिल्ह्यातील म्हैसाळ (२९.६६. कोटी), टेंभू (१७.५. कोटी) आणि ताकारी (३ कोटी) या तिन्ही योजनांची थकबाकी या निधीतून भरली जाणार आहे. विशेषत: थकबाकीमुळे सध्या बंद असलेल्या म्हैसाळी थकबाकी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तातडीने भरली जाणार असून पाणी सुरू करण्यात येणार आहे.
त्यानुसार पाटबंधारे विभागातही अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. पैसे आल्यानंतर वीजपुरवठा जोडण्यासाठी महावितरण कंपनीला सांगण्यात येणार होते. मात्र अद्यापही शासनाकडून वीजबिल भरण्यासाठी काहीही निधी उपलब्ध झाला नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम वसूल झाली तरच वीजबिल भरणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. योजनांसाठीच्या वीजबिलाचा निधी मंजूर झाला असून तो त्वरित वर्ग होणार असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. अधिकारी मात्र निधी मिळाला नसल्याचे सांगत आहेत. शासनाने थकीत वीजबिल भरण्यासाठी मंजूर केलेला ५० कोटींचा निधी नक्की कुठे अडकला, असा सवालही शेतकरी करू लागले आहेत.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही वीजबिल भरण्यासाठी काही निधी मिळाला आहे का, योजना कधी सुरू करणार, याबाबत विचारणा केली. या वेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी अद्याप वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठा बंदच आहे. वीजबिल भरल्यानंतरच तो सुरळीत करण्यात येणार असल्याचेही सांगितले.