म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे भवितव्य अंधारमय

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली : मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्‍यांना वरदान ठरणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही वीजबिल व पाणीपट्टीच्या चक्रात अडकली आहे. या योजनेचे वीजबिलाचे ३४ तर पाणीपट्टीचे ७४ कोटी रुपये थकलेले आहेत. त्यामुळे ही योजना सुरू होण्याची शक्यता कमी असून, तिचे भवितव्य अंधारमय दिसत आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे आजही तलाव, ओढ्यांना पाणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई नाही, असे वाटते आहे. मात्र, दुष्काळी भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. टंचाईच्या काळात ही योजना सुरू केली होती. या काळातील वीजबिलाची रक्कम शासन देणार आहे. पंरतु पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने कोणत्याच हालचाली केलेल्या दिसत नाहीत.

या योजनेचे पाणी ज्या भागातील शेतकऱ्यांना मिळाले त्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टीदेखील भरली आहे. मात्र, ही योजना सुरू झाल्यापासून शेवटच्या गावापर्यंत पाणीच पोचले नाही. त्यामुळे पाणीपट्टी देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. एका बाजूने शेतकऱ्यांची भूमिका योग्य असली तरी, त्यावर पाणीपट्टीचा मार्ग काढण्यासाठी आज कोणीही पुढे आलेले नाही.

म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी वीजबिलाच्या ५० टक्के म्हणजे १७ कोटी रुपये भरणे अत्यावश्‍यक आहे. तरच ही योजना सुरू होईल. परंतु या योजनेचे पाणी वाटपाचे नियोजनच नसल्याने शेतकरी पाणीपट्टी भरण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणीवाटपाचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

म्हैसाळची पाणीपट्टी ७१ कोटींवर वास्तविक योजना सुरू झाल्यानंतर त्याचे योग्य नियोजनच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणीच मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी पाणीपट्टी भरण्यास नकार देत आहेत. मुळात या योजनेचे पाणीवाटपाचे नियोजन काटेकोर होणे गरजेचे आहे, तरच शेतकऱ्यांना पाणी मिळेल. पण पाटबंधारे याचे नियोजनच करत नाही. यामुळे या योजनेची थकबाकी वाढतेय. या योजनेची पाणीपट्टीची थकबाकी ७१ कोटींवर पोचली आहे.

लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील अगोदरच पिके पाण्याविना वाळून जाऊ लागली आहेत. पण पुढील काळात पिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी ही योजना सुरू केली पाहिजे. म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे; तर द्राक्ष, डाळिंब बागेला पाणी मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com