चाळीसगाव : गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले आवर्तन शुक्रवारी (ता. ८) पाचला सोडण्यात आले. या आवर्तनाचा शेतकऱ्यांना रब्बीसाठी फायदा होणार आहे. हे आवर्तन सुमारे ३ हजार १०० दशलक्ष घनफूट असून महिनाभर सुरू राहणार आहे. त्याचा सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होईल, अशी माहिती मिळाली.
पहिल्या व सहाव्या क्रमांकाचे दरवाजे उचलून पाणी सोडले आहे. दोन हजार क्युसेक एवढे हे आवर्तन आहे. आवर्तनाचा रब्बी हंगामाला विशेष फायदा होणार असून चांगल्या उत्पादनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वर्षी गिरणा साडे नव्वद टक्के भरले होते. त्यामुळे त्या वेळी तीन आवर्तने सिंचनासाठी मिळाली होती.
यंदा रब्बीसाठीचे पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सुटणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे दोन दिवसांचा उशीर झाला. गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जे. माने यांच्या मार्गदर्शनानुसार आवर्तन सोडण्यात आले. या वेळी गिरणा धरणावर उपभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
कालव्याच्या पाण्यासंदर्भात अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ झाली असून २० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. सध्या गिरणा परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत आहे. त्यात नदीला आवर्तन सोडण्यात आले. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळेस सिंचनाचे काम किती होईल हादेखील प्रश्न आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.