जळगाव ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. परंतु कालव्याच्या शेवटच्या टोकातील अनेक लाभार्थी शेतकरी पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. तसेच दोनच आवर्तने मिळणार असून, आणखी एका आवर्तनाची गरज आहे. तिसऱ्या आवर्तनाअभावी हरभरा व ज्वारी या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
धरणाचे पहिले आवर्तन ८ डिसेंबरला सोडण्यात आले होते. ते महिनाभर सुरू होते. आता मागील आठवड्यात दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. तेदेखील महिनाभर सुरू राहील. जामदा डावा व उजवा कालव्यासह गिरणा निम्न कालव्यातून शेतापर्यंत पाणी सोडण्यात आले आहे. या धरणाचा लाभ सुमारे २१ हजार हेक्टरला होतो. परंतु यंदा धरण ७५ टक्केच भरल्याने त्यातून दोनच आवर्तने सोडली जातील, असा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत धरणातून तीन आवर्तनांची मागणी करण्यात आली होती. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, डॉ. सतीश पाटील यांनी त्यासंबंधीचे मुद्दे मांडले होते.
परंतु दोनच आवर्तने सोडण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना कमी पाण्यावरची पिके घेण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. हरभरा व ज्वारी ही पिके गिरणा पट्ट्यात अधिक असून, तिसरे आवर्तन मिळणार नसल्याने हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यातच भडगाव, चाळीसगाव, धरणगाव भागांतील शेवटच्या टोकाच्या लाभार्थींना पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. वितरिकेनजीकच्या सुरवातीचे लाभार्थी अधिकचे पाणी वळवून घेतात. त्यामुळे पुढे पाणीच येत नाही. तसेच वितरिकांमध्ये काटेरी झुडपे व इतर समस्या आहेत. त्यात पाणी जिरते व ते पुढे जात नाही. मुख्य कालव्यालाही अनेक ठिकाणी तडे पडले असून, त्यातून पाणी वाया जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमध्ये आहेत. जेवढे लाभार्थी व कालवाग्रस्त शेतकरी आहेत, त्यापैकी निम्मेच शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. म्हणजेच निम्मेच क्षेत्र ‘गिरणे’च्या पाण्याने भिजत आहे.