मागेल त्याला थेट शेतमाल खरेदी परवाना द्या : पणन मंत्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कांद्याला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, कांदा खरेदीसाठी स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी खास बाब म्हणून राज्यात मागेल त्याला खरेदीदाराचा परवाना (डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स) देण्यात यावा, असे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) दिले.

उत्तर पूर्व, ईशान्येकडील राज्यात कांदा पाठविण्याच्या नियोजनाबाबत पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार डॉ. राहुल आहेर, पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, नाशिक उपनिबंधक नीलकंठ करे, महा एफपीओचे योगेश थोरात, मध्य रेल्वेचे एस.एस. सोनवणे, एमएसएएमबीचे दिग्विजय आहेर आदी उपस्थित होते.

मंत्री देशमुख म्हणाले की, देशाच्या एकूण कांदा निर्यातीच्या ७० ते ८० टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते. त्यातही नाशिक व लासलगावचा कांदा प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना अडचण येऊ नये, मालाला योग्य भाव मिळावा, अडते व व्यापारी यांची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी खरेदीदार आणि अडत्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे मागेल त्याला खरेदीदार परवाना देण्याचे धोरण नाशिकमध्ये सुरू करावे. त्यासाठी तातडीने जाहिरात द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

मंत्री देशमुख यांनी कांद्याच्या दरात गेल्या ८-१० वर्षांत अचानक झालेला चढउतार आणि त्या वेळी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून यावर्षीच्या कांद्याच्या खरेदीचे नियोजन करावे, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच राज्यातील कांद्याला उत्तर पूर्व, ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठी मागणी आहे. तेथे कांद्याला भावदेखील चांगला आहे. त्याठिकाणी राज्यातील कांद्याची शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निर्यात करण्यात यावी. चंडीगड, दिल्ली, कोलकाता येथे शासकीय गोदाम उपलब्ध करून द्यावे आणि शासनाने कांदा ठेवण्यासाठी स्वत:ची गोदाम घ्यावीत, अशा सूचना देशमुख यांनी या वेळी केल्या.

देशमुख पुढे म्हणाले, कांदा हा नाशवंत माल असल्याने त्याच्या साठवणुकीपेक्षा पर्यायी बाजारपेठेचा विचार करावा. कांद्याचे भाव कोसळल्यास विक्रीचे नियोजन करावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी चांगले काम करून शेतकरी व बाजारपेठेतील दुवा म्हणून काम करावे.

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार कोलकाता जवळील फतुहा यासह चितपूर, मालडा, आझादपूर मंडी याठिकाणी कांद्याला चांगला भाव आणि मागणी आहे. पण त्याठिकाणी रेल्वेने माल पाठविल्यावर काही तांत्रिक अडचणी येतात. फतुहा येथे कांद्याची वाहतूक सुलभतेने व्हावी, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याची सूचना त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com