परभणी : राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १४३ गोदामांमध्ये गतवर्षीची तूर तसेच यंदा खरेदी करण्यात आलेले सोयाबीन, मूग, उडीद पडून आहे. त्यामुळे सध्या या गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठविता येईल एवढीच जागा शिल्लक राहिली आहे. वखार मंडळाच्या गोदामांत जागा शिल्लक नसल्यामुळे तूर साठविण्यासाठी खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४४ गोदामे असून, त्यांची साठवण क्षमता ६९ हजार १३० मेट्रिक टन आहे. हिंगोली जिल्ह्यात २० गोदामे असून त्यांची साठवण क्षमता २९ हजार ४०० मेट्रिक टन आहे. नांदेड जिल्ह्यात ३२ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ५० हजार २१६ मेट्रिक टन आहे.
लातूर जिल्ह्यात ३९ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ८८ हजार ५२० मेट्रिक टन आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८ गोदामे असून, त्यांची साठवण क्षमता १३ हजार मेट्रिक टन आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १४३ गोदामे असून त्यांची एकूण साठवण क्षमता २ लाख ५० हजार १९६ मेट्रिक टन (२५ लाख क्विंटल १ हजार ९६० क्विंटल) आहे.
सध्या या गोदामांमध्ये १२ लाख ६३ हजार २४० क्विंटल तूर, ८ हजार ५०० क्विंटल मूग, ४८ हजार १४० क्विंटल उडीद, ७३ हजार ९७० क्विंटल सोयाबीन साठविण्यात आलेले आहे. तसेच या गोदामांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गहू, तांदूळ साठविलेला आहे. त्यामुळे सध्या परभणी जिल्ह्यातील गोदामामध्ये ६ हजार, हिंगोली जिल्ह्यात २५ हजार, नांदेड जिल्ह्यात २१ हजार ४००, लातूर जिल्ह्यात २६ हजार आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३०० क्विंटल अशा १४३ गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठवण क्षमता राहिली आहे.
वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे सध्या अनेक ठिकाणच्या खरेदी केंद्रांवर तूर पडून आहे. नाफेड तसेच संबंधित यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली तूर वखार महामंडाळाच्या गोदामात साठविल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना चुकारे अदा केले जातात.
परभणी येथे तालुका खरेदी विक्री संघामार्फत बाजार समिती परिसरातील अग्निशामक बंबासाठी उभारण्यात आलेल्या निवाऱ्यामध्ये तूर खरेदी केली जात आहे. त्या ठिकाणी एक चाळणी, एक वजन काटा सुरू आहे. जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे दुसरी चाळणी, वजन काटा सुरू करता येत नाही.
दरम्यान, वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खासगी किंवा बाजार समित्यांचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.