रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर

रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर
रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर

मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या हंगामात तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना व मदत जाहीर केली आहे. संबंधित तालुक्यात तातडीने आठ सवलती लागू करण्यात आल्या असून शेतपिकांच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रचलित पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, जलविषयक निर्देशांक आणि पीकपाहणी या गोष्टी विचारात घ्याव्यात, अशा सूचना आहेत. तीव्रतेनुसार गंभीर दुष्काळ, मध्यम दुष्काळ आणि सामान्य स्थिती असे दुष्काळाचे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार रब्बी २०१७-१८ च्या हंगामातील परिस्थितीचा विचार करून यवतमाळ, वाशीम आणि जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यात तातडीने दिलासादायी आठ उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने जारी केले आहेत.

या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना दिले जाणार आहे. या मदतीचे वाटप सन २०१७-१८ च्या रब्बी हंगामातील सातबारामधील पिकांच्या नोंदीच्या आधारे देण्यात येईल. हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगाअंती ठरवण्यात आलेल्या पीक पैसेवारीच्या आधारे पिकांचे नुकसान ठरवण्यात येणार आहे, तर फळबागांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची खात्री शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात येणार आहे. पंचनाम्यासोबत अशा शेतीतील पिकांचे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम दर्शवणारे फोटो काढण्यात येणार आहेत. फळबागांचे उत्पादन सरासरी पीक उत्पादनाच्या ६७ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास मदत मिळणार नाही. त्याशिवाय या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुटीच्या कालावधीतही राबविण्यात यावी, मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या. दुष्काळ घोषित केल्याचे हे आदेश पुढील सहा महिने लागू राहणार आहेत.

दिलासादायी उपाययोजना जाहीर - १) जमीन महसुलात सूट २) सहकारी कर्जाचे पुनर्गठण ३) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती ४) कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट ५) शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी ६) रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता ७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर ८) शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे. दुष्काळ जाहीर झालेले तालुके ः राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर, यवतमाळ (जि. यवतमाळ), वाशीम (जि. वाशीम) आणि मुक्ताईनगर, बोदवड (जि. जळगाव). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com