सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यता

कांदा
कांदा

नवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काढणीच्या हंगामात बाजारात आवक वाढत असल्याने अत्यंत कमी दर मिळतो. तर बाजारात आवक कमी असते तेव्हा कांदा दर प्रचंड वाढतात आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रिसाठी येईल तेव्हा सरकार खरेदी करून साठा करेल. बाजारात आवक कमी होऊन दर वाढतील तेव्हा सरकार हा साठा बाहेर काढून ग्राहकांना दिलासा देण्याचे काम करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दर वर्षी कांदा काढणीच्या हंगामात जेव्हा बाजारात मालाची आवक वाढते तेव्हा व्यापारी दर पाडतात. कमी दरात कांदा खरेदी करून साठवणूक करतात आणि जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात येणे बंद होतो आणि दर वाढतात तेव्हा वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी व्यापारी आपला साठा बाहेर काढतात. वाढलेल्या दराने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात. परंतु, त्याचा फायदा शेतकऱ्यांना काहीच होत नाही. कांदा दर वाढल्यास त्याचा मोठा राजकीय तोटा ही होत असतो. विरोधक नेहमीच हा प्रश्न उचलून धरतात. त्यामुळे कांदा दराचा प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच मंत्री बैठक झाली. या बैठकीत कांदा आणि टोमॅटो या दोन्ही पिकांचा सद्यस्थितीतील बाजाराचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कांदा दरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.  देशात डिसेंबर महिन्यात बाजारात आवक कमी झाल्याने कांदा दर वाढून किरकोळ दर ८० रुपयांपर्यंत गेले होते. खरिपात कांदा पिकाला फटका बसल्याने बाजारात आवक कमी झाली होती. कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, आयातीला प्रोत्साहन देणे तसेच साठा मर्यादा लावणे आदी उपाय सरकारने केले होते. सध्या बाजारात आवक वाढल्याने कांदा दर कमी होत आहेत. येणाऱ्या महिन्यात आवक आणखी वाढेल तेव्हा दर आणखी कमी होतील. मागील आठवड्यात लासलगाव बाजारात मागील चार महिन्यांतील सर्वात कमी दर कांद्याला मिळाला होता.  शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा शेतकरी जेव्हा कांदा काढणी करतात आणि बाजारत विक्रीसाठी आणतात त्या वेळी कांदा दर आवक वाढल्याने कमी होतात. शेतकऱ्यांना मिळणारा दर हा खूपच कमी असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही आणि शेतकरी अडचणीत येतात. एकदा शेतकऱ्यांचा कांदा विकून झाला आणि बाजारात आवक मंदावली की व्यापारी आपला माल टप्प्याटप्प्याने बाहेर काढतात आणि वाढलेल्या दराचा फायदा घेतात. ग्राहकांना या वेळी जास्त पैसे मोजावे लागतात; परंतु याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे सरकार जेव्हा शेतकरी कांदा बाजारात विक्रीसाठी आणतील त्या वेळी खरेदी करेल आणि साठा करेल आणि बाजारात जेव्हा कांदा आवक कमी होऊन दर वाढतील तेव्हा विक्री करेल आणि दर नियंत्रणात आणेल. यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोन्हींनाही दिलासा मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दर कसा ठरविणार? सरकारने शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकार केवळ २३ पिकांचे हमीभाव जाहीर करते त्यामध्ये कांद्याचा समावेश नाही. त्यामुळे सरकार कोणत्या दराने कांदा खरेदी करणार आणि खरेदी दर कसा ठरविणार हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. मात्र सरकारने कांदा खरेदी केल्यास इतर पिकांप्रमाणे कांदा दरही वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com