मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. १९) राज्य सरकारने तब्बल २० हजार ३२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळ घोषित केलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी २,२०० कोटींच्या तर दूध खरेदी आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी शेतकऱ्यांना तसेच विविध प्रक्रिया संस्थांना अनुदान देण्यासाठी ३०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व घटकांना खूश करण्याचे शासनाचे धोरण पुरवणी मागण्यांकडे पाहता दिसून येते. विधिमंडळात मांडण्यात आलेल्या एकंदर पुरवणी मागण्यांपैकी तब्बल १६ हजार ५१६ कोटी रुपयांचा वित्तीय भार शासकीय तिजोरीवर पडणार आहे. पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक ३ हजार कोटींचा निधी विविध पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत भूसंपादन पुनर्वसन व सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाची बिले अदा करण्यासाठी दिला आहे. महावितरण कंपनीकडून कृषी व यंत्रमागधारकधारक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतींपोटी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापोटी २ हजार कोटींची आणि हायब्रीड अॅन्यूईटी या योजनेअंतर्गत रस्त्यांची बांधकामे करण्यासाठी १,५०० कोटींची तरतूद तर सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत लघू मध्यम मोठ्या उद्योग घटकांना तसेच विशाल प्रकल्पांना मंजूर प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी १ हजार कोटी दिले जाणार आहेत. इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मेट्रीकोत्तर शिष्यवृत्तीपोटी ७०० कोटी, सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजनेसाठी ५०० कोटी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४२५ कोटी, महात्मा जाेतिबा फुले जनआरोग्य योजना ४२५ कोटी, संजय गांधी निराधार योजना ३७५ कोटी, पेयजल टंचाई उपाययोजनेसाठी ३०० कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्वसाधारण वर्गवारीसाठी २७५ कोटी, ज्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना शुल्क माफीसाठी २७५ कोटी, राज्य मार्ग बिगर अनुशेष या योजनेअंतर्गत २५० कोटी, जिल्हास्तरीय रस्त्यांसाठी राज्यस्तरीय निधी २५० कोटी, स्वच्छ भारत मिशनसाठी २११ कोटी, विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषिपंपांना उच्च दाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यासाठी २०० कोटी, आयुष्यमान भारत योजनेसाठी २०० कोटी, आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी २०० कोटी आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांत पुरवणी मागण्यांचा उच्चांक निर्माण झाला असून, आतापर्यंत सुमारे १ लाख ७६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या अर्थसंकल्पाव्यतिरिक्त मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळेच राज्याच्या तिजोरीची वित्तीय शिस्त बिघडल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. कोणत्या विभागासाठी किती तरतूद -
गेल्या चार वर्षांतील पुरवणी मागण्यांचे आकडे-
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.