साखर खरेदीला शासनाची बगल?

साखर खरेदीला शासनाची बगल?

कोल्हापूर: साखरेचे घसरते दर स्थिर राहण्यासाठी राज्य शासनाने दहा लाख टन साखर खरेदी करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेला बगल मिळण्याची शक्यता आहे. याऐवजी शासनाने रेशनिंगसाठी ३२ रुपये किलोने थोड्या थोड्या प्रमाणात साखर कारखान्यांकडून खरेदी करावी, असा प्रस्ताव शासनापुढे मांडला जाण्याची शक्‍यता आहे. एकदम दहा लाख टन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची तरतूद नसल्याने रेशनिंगसाठी लागणारी साखर खरेदी करण्याचा पर्याय सामोर आला आहे.  मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वीच साखर उद्योगाच्या अडचणीबाबत उपाय सुचविण्यासाठी संबंधित मंत्री, सर्वपक्षीय नेते, कारखानदार, शासकीय अधिकारी, राज्य, केंद्राच्या साखर महासंघांचे पदाधिकारी यांची एकत्र ‘टास्क फोर्स’ (विशेष समिती) तयार केली आहे. या फोर्सने घेतलेल्या निर्णयाबाबत सरकार सकारात्मक विचार करून हा निर्णय तातडीने अमलात आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. यानुसार या टास्क फोर्सच्या बैठकीत शासनाने रेशनिंगसाठी साखर 32 रुपये किलोप्रमाणे खरेदी करावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. तो लवकरच शासनाकडे देण्यात येणार आहे. 

ही होती सहकारमंत्र्यांची घोषणा  फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखरेचे घसरते दर स्थिर ठेवण्यासाठी राज्य शासन पहिल्यांदाच यात हस्तक्षेप करणार असल्याचे म्हटले होते. राज्यातील विविध कारखान्यांतून निर्माण होणारी सुमारे दहा लाख टन साखर शासन ३२०० रुपये हमीभावाप्रमाणे खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. याबाबतचा प्रस्तावही साखर आयुक्तालयाने शासनाकडे पाठविला होता. प्रस्ताव पाठवून एक महिना होऊनही याबाबत निर्णय होत नसल्याने कारखानदार अस्वस्थ होते. अखेर एकदम खरेदी सध्या तरी शक्‍य नसल्याचाच सूर या टास्क फोर्समधील चर्चेत दिसून आला. 

दर स्थिर राहण्यासाठीच घोषणा? साखरेचा बाजार हा केंद्र व राज्य स्तरावरील साखरेच्या निर्णयावरही अवलंबून असतो. अनेकदा साखरेबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास त्याचा प्रभाव काही काळ बाजारावर राहून साखरेचे दर बाजारात वधारतात असा अनुभव आहे. किमान निर्णय जाहीर केल्यास दर वधारतील या भावनेतून शासनाने निधीची तरतूद नसतानाही ही घोषणा केली. या वेळी आयातशुल्क शंभर टक्के करण्याचीही घोषणा केंद्राने केल्यानंतर दोन्ही घोषणांचा तातडीचा परिणाम म्हणून साखरेच्या दरात आठवडाभर साखरेच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली. पण त्यानंतर साखरेची झालेली घसरगुंडी कायम आहे. अजूनही साखरेचा दर ३००० ते ३१०० रुपयांच्या आसपासच रेंगाळत आहे.  

केंद्राकडे समस्या मांडणार मुख्यमंत्र्यांनी नेमलेली टास्क फोर्स ही दोन स्तरावर काम करणार आहे. राज्य शासनाला जे उपाय सुचवायचे असतील ते थेट सुचविले जातील. केंद्र स्तरावरच्या मागण्यांचे टिपण तयार करून ते केंद्राला सादर करण्यात येणार आहेत. नव्याने होणाऱ्या मागण्यांचे टिपण तयार करण्याचे काम सुरू असून, ते लवकरच केंद्राला देण्यात येणार असल्याचे टास्क फोर्समधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com