नगर ः जिल्ह्यात यंदा उशिराने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. मात्र टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करताना फेऱ्यात होणाऱ्या तफावतीचा अनुभव असल्यामुळे यंदा पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरना ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सातत्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या जल संधारणाच्या कामांमुळे यंदा पाणीटंचाईच्या झळा कमी आहेत. साधारण जानेवारीपासूनच अनेक गावांत टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र यंदा अजूनपर्यत अनेक गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज पडली नाही.
सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पाणीटंचाई आहे. यात संगमनेरमध्ये १४, अकोल्यामध्ये दोन, कोपरगावमध्ये एक, नगरमध्ये पाच, पारनेर तालुक्यात १३, पारनेर शहराइत तीन टॅंकर सुरू आहेत. याशिवाय पाथर्डी तालुक्यात दोन टॅंकर मंजूर झाले आहेत. अद्याप ते सुरू झालेले नाहीत. मंजुर झालेल्या टॅंकरच्या खेपा योग्य प्रकारे होत आहेत अथवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रत्येक टॅंकरला ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. टॅंकर गावात अथवा वाड्यांवर गेल्यानंतर तेथील पाणीपुरवठा समितीतील प्रतिनिधीची स्वाक्षरी आणल्याशिवाय टॅंकरचे बिल मंजूर होत नाही.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या चार जानेवारी २०१४ च्या परिपत्रकानुसार टॅंकरची देयके अदा करताना टॅंकरवर ‘जीपीएस’ प्रणाली बसविलेली असणे आवश्यक. या प्रणालीवर ज्या टॅंकरच्या फेऱ्यांची नोंद होईल, त्याच फेऱ्या देयकांकरिता अनुज्ञेय राहतील. या प्रणालीच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे.