सातारा : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तब्बल ७३०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (ता. २९) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.
जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १६ ऑक्टोबरला होत आहे. उमदेवारी दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली असून, ७३०४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रथमच सरपंचपद हे लोकांतून निवडून द्यायाचे असल्याने या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी सर्व्हर डाउन झाल्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. सर्व इच्छूकांना अर्ज भरता यावेत यासाठी साडेसहा वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात आली होती.
गुरुवारी (ता.५) अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ज्या ठिकाणी सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी आहे अशा ग्रामपंचायतींत इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.