पुणे : जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या किंवा भाडेतत्त्वावरील जागेत असलेल्या २९२ ग्रामपंचायत कार्यालयांना आता स्वत:च्या मालकीची इमारत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून ग्रामपंचायत इमारतींची कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावातील विविध विकासकामे केली जातात. शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोचण्यास मदत होते, तसेच गावाच्या विविध नोंदी जतन केल्या जातात. पुणे जिल्ह्यात एकूण १४०७ ग्रामपंचायती आहेत. मात्र, त्यातील काही ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीची जागा नाही. त्यामुळे गावातील एखाद्या भाडेतत्त्वावरील खोलीत किंवा समाजमंदिरात या ग्रामपंचायतींचे कामकाज चालवले जाते.
यातच काही ग्रामपंचायतींच्या इमारती मोडकळीस आल्या अाहेत. पावसाळ्यामध्ये पाणी गळण्यामुळे या ग्रामपंचायतींमधील कागदपत्रांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
एक हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या असलेल्या १४३ ग्रामपंचायती, दोन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या १०० ग्रामपंचायती, तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४९ ग्रामपंचायत कार्यालयांसाठी नव्याने इमारती उभारण्यात येणार आहेत. यात भोर तालुक्यात सर्वाधिक ५८, खेड तालुक्यातील ४८, मावळमधील ३०, इंदापुरातील ३०, वेल्ह्यातील २९, जुन्नरमधील २२, पुरंदरमधील २२, मुळशीतील २१, दौंडमधील १३, बारामतीतील ७, शिरूरमधील ६, हवेलीतील ४, तर आंबेगाव तालुक्यातील २ ग्रामपंचायती कार्यालयांसाठी नवीन इमारती उभारण्यात येणार आहेत.