सांगली : सांगली आणि तासगाव या दोन ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र, हमीभावात हरभरा विक्री करायची असेल तर सांगली आणि तासगाव येथील केंद्रावर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नोंदणीसाठी यावे लागते. शेतकऱ्यांना ही दोन्ही केंद्रे लांब पडत असल्याने प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
सांगली जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र सुमारे २८ हजार ७३१ इतके आहे. मुळात हरभरा खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. हरभऱ्यास शासन ४४०० रुपये क्विंटल हमीभाव देत आहे.
मात्र, हरभऱ्याची हमीभावात विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. हरभरा पिकाची सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक आहे. हमीभावात हरभरा विक्रीसाठी सातबारा उतारा, आधार कार्ड आणि बॅंकेच्या बचत खात्याचे पासबूक या तिन्हींची झेरॉक्स लागते. ही सर्व कागपत्रे घेऊन शेतकरी नोंदणीसाठी पुढे येत आहेत.
परंतु, सांगली जिल्ह्यात केवळ दोनच खरेदी केंद्र सुरू असल्याने शिराळा तालुक्यातील शेतकऱ्याला हरभरा विक्रीसाठी सांगलीतील केंद्राचा आधार घ्यावा लागतो. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सांगलीतील केंद्रात यावे लागते. अर्थात नोंदणीसाठी हेलपाटा, त्यानंतर विक्रीसाठी पुन्हा सांगली गाठायची. म्हणजे दोन वेळा सांगलीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
खरेदी केंद्रावर माल चांगला नसला, तर परत पाठवण्याच्या प्रकाराने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते आहे.