नगर ः जिल्ह्यात आतापर्यंत ६९५४ शेतकऱ्यांकडून ६९ हजार ६५४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. हरभरा खरेदीसाठी सध्या जिल्हाभरात १३ खरेदी केंद्रे सुरू असून खर्डा (ता. जामखेड) येथील केंद्रावर सर्वाधिक ३२ हजार २९८ क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग फेडरेशन कार्यालयातून देण्यात आली.
जिल्ह्यात यंदा तुरीप्रमाणेच हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र बाजारात दर्जा नसल्याचे सांगत व्यापारी हमीभावापेक्षा साधारण एक हजार रुपये कमी दराने हरभरा खरेदी करत आहेत. त्यामुळे तुरीप्रमाणेच हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी वाढली.
त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी १३ ठिकाणी केंद्रे सुरू झाली आहेत. एक ते दोन ठिकाणचे अपवाद वगळता मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून तूर खरेदी केंद्रांवरच हरभरा खरेदी केंद्रे सुरू आहेत. यंदा साधारण दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी होण्याची अपेक्षा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आतापर्यंत ६९५४ शेतकऱ्यांकडून ६९ हजार ६५४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे. तुरीप्रमाणेच हरभरा विक्रीसाठीही शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजारांवर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.