सांगली : जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली या दोन खरेदी केंद्रांवर दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. तसेच आजअखेर १४ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून अजून ४०० क्विंटल तूर खरेदीची शक्यता आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका आणि सांगली अशी दोन हरभरा खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. येथे हरभऱ्याला हमीभाव ४४०० रुपये क्विंटल आहे. आजअखेर यासाठी ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तासगाव आणि सांगली येथील खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शेतकरी येत आहेत. मात्र, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यासह विटा तालुक्यात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
जिल्ह्यात हमीभावाने १४ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून अजून सुमारे ४०० क्विंटल तूर खरेदी होईल असा अंदाज मार्केटिंग अधिकारी आर. एन. दानोळे यांनी व्यक्त केला आहे.
सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे केली होती. या दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पूर्व आढावा बैठक झाली होती.
या बैठकीत आमदार अनिल बाबर यांनी प्रत्येक तालुक्यात कडधान्ये खरेदी करण्याची मागणी केली होती. त्या वेळी सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यात हमीभावाने कडधान्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अद्यापही त्यावर कार्यवाही केली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. केवळ बैठकीत घोषणा केल्या जातात. पण प्रत्यक्षात त्यावर तोडगा काढला जात नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते आहे.