जळगाव ः जिल्ह्यात हरभरा खरेदी रखडतच सुरू आहे. परिणामी सर्वच हरभरा उत्पादकांना या शासकीय खरेदीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा हरभरा पेरणीने उच्चांक गाठला. आवक अधिक आणि शासकीय खरेदी केंद्रांची अपुरी संख्या अशी स्थिती जिल्ह्यात आहे.
तूर खरेदी जशी रखडत सुरू होती, तशीच स्थिती हरभरा खरेदीची असून, भडगाव व रावेर येथे खरेदी केंद्र सुरू झाले आहे. भडगावचे केंद्र सुरू होऊन सुमारे १५ दिवस झाले, तर रावेरचे केंद्र याच आठवड्यात सुरू झाले. एकूण ५०० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.
यंदा हरभऱ्याचे उत्पादन चांगले आले आहे. शासकीय यंत्रणांनी मात्र गोदामांची अपूर्ण संख्या व मार्चएंडची कामे यामुळे हरभरा खरेदीला वेगाने सुरवात झालेली नसल्याचे म्हटले आहे.
तूर खरेदी सुरू आहे. नऊ केंद्रांत तूर खरेदी सुरू असून, ती आता अंतिम टप्प्यात आहे. या महिन्यात तूर खरेदी बंद होईल. ज्या नऊ केंद्रांमध्ये तूर खरेदी सुरू आहे, त्या केंद्रांव्यतिरिक्त भडगाव, पारोळा व यावल येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करायचे नियोजन होते. यातील भडगाव केंद्र सुरू झाले. उर्वरित ११ खरेदी केंद्रे सुरू झालेली नसल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांना खासगी बाजारात मिळेल त्या दरात हरभरा विक्री करावी लागत आहे.
खासगी बाजार किंवा बाजार समितीत हरभऱ्याला ३५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत. जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, अमळनेर, यावल, चोपडा व पारोळा येथे हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. नोंदणी व इतर तयारी झाली आहे. परंतु धान्य साठवायला
जळगाव नजीकच्या धुळे जिल्ह्यात जागा नसल्याने मागील १५ दिवसांपासून जी तूर व इतर धान्य खरेदी केले, ते साठवणुकीसाठी नवापूर (जि. नंदुरबार) येथे पाठविले जात आहे. सुमारे सहा हजार क्विंटल तूर व हरभरा नवापूर येथील शासकीय गोदामात साठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.