जळगाव ः जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी यंदा सर्वाधिक झाली. पीक हातात आले आहे. परंतु यंदा समाधानकारक दर नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. खासगी बाजार किंवा बाजार समितीमध्ये ३६०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहे. अशातच जिल्ह्यात नऊ ठिकाणी येत्या १० ते १२ दिवसांत शासकीय हरभरा खरेदी केंद्रे सुरू होतील, असे संकेत मिळाले आहेत.
शासन ४४०० रुपये प्रतिक्विंटल या दरात हरभरा खरेदीचा विचार करीत असून, या महिन्याच मध्यापर्यंत खरेदी सुरू होईल, असे संकेत मध्यंतरी सूत्रांनी दिले होते. यातच यंदा प्रथमच शासकीय पातळीवरून हरभरा खरेदी केली जाणार असून, सुरवातीला पाच केंद्रे असतील.
हे केंद्र हरभऱ्याचे अधिक उत्पादन असलेल्या भागात सुरू करण्याचे नियोजन असून रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, जामनेर व बोदवड येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. या नऊ केंद्रांमध्ये सध्या तूर खरेदी सुरू आहे.
हरभरा खरेदीसाठीही ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पीक पेरा असलेला सातबारा उतारा, बॅंक पासबुक व आधार कार्डची सत्यप्रत, मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. अपेक्षित नोंदणी झाल्यानंतर खरेदी सुरू होईल. खासगी बाजारातील सद्यःस्थिती लक्षात घेता नोंदणीला प्रतिसाद मिळेल, असे सांगण्यात आले.
जिल्ह्यात पारोळा, धरणगाव, भडगाव या भागात पावसाचे प्रमाण कमी होते. या भागात हरभऱ्याची पेरणी कमी असते. असे असले तरी या तालुक्यांनजीक हरभरा खरेदी केंद्रे असतील. यावलच्या शेतकऱ्यांना रावेर किंवा चोपडा येथेही हरभरा आणता येईल. धरणगाव, एरंडोलच्या शेतकऱ्यांसाठी जळगाव तालुक्यातील म्हसावद केंद्र सोईस्कर असेल.
यंदा सुमारे ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. उत्पादनही बऱ्यापैकी आले आहे. उत्पादन हाती आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची विक्री सुरू केली आहे. जिल्ह्यात अमळनेर, चोपडा व धुळ्यातील शिरपूर येथील बाजारांना शेतकरी प्राधान्य देत आहेत. कमाल चुकारे रोखीने व सेम डे धनादेश मिळत असल्याने या बाजारात शेतकरी हरभरा विक्रीसाठी नेत आहेत.