जळगाव ः जिल्ह्यात नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र अजूनही सुरू झालेले नाहीत. हे केंद्र या महिन्याच्या मध्यात सुरू होतील, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले होते. परंतु वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आलेले नसल्याने हे केंद्र सुरू होण्यास विलंब होत आहे.
जिल्ह्यात यंदा सुमारे ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. त्यात देशी प्रकारच्या हरभऱ्याची पेरणी अधिक होती. काबुली हरभऱ्याची पेरणी चोपडा, रावेर भागात अधिक झाली होती. हरभरा मळणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी तर हरभरा विक्री केली आहे. काबुली हरभऱ्यास खासगी बाजारात किंवा बाजार समितीत ५५०० रुपये क्विंटल तर देशी हरभऱ्यास ३५०० रुपये क्विंटल दर आहे. परिणामी शेतकऱ्यांना कमी दरात हरभरा विक्री करावी लागत आहे.
जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीचे आदेश दिले आहेत. नोंदणी मागील १५ दिवसांपासून सुरू आहे. परंतु फक्त दोन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. नोंदणीला प्रतिसाद नसल्याने कुठे केंद्र सुरू करायचे व कुठे केंद्र सुरू करण्यास उशीर करायचा यासंदर्भात प्रशासन विचार करीत आहे. कारण नोंदणीला जेथे प्रतिसाद नसेल, तेथे केंद्र सुरू करणे योग्य होणार नाही. तर जेथे अधिक मागणी व प्रतिसाद आहे, त्या भागात पहिल्याच टप्प्यात खरेदी केंद्र सुरू होतील.
जिल्ह्यात सुरवातीला भडगाव, रावेर, चोपडा, यावल, मुक्ताईनगर व जामनेर येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू केले जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या गुरुवारपर्यंत (ता. २२) किमान चार खरेदी केंद्र सुरू होतील. त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत सर्व ११ खरेदी केंद्र सुरू होतील. त्यात चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, बोदवड आणि जळगाव येथे खरेदी केंद्र सुरू होतील.