औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास वीस हजार हेक्टरने हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे रब्बीत हरभरा प्रमुख पीक बनले असून, लातूरमध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याची जवळपास दुप्पट क्षेत्रावर झालेली पेरणी मराठवाड्यात सर्वाधिक ठरली आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचा पेरा सर्वांत कमी राहिला आहे. सध्या हरभऱ्याचे पीक फूल आणि घाट्याच्या अवस्थेत आहे.
औरंगाबाद, परभणी, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अपेक्षित प्रमाणात रब्बी पेरणी झालेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७९, उस्मानाबाद जिल्ह्यात ८६, परभणी जिल्ह्यात ७२, तर हिंगोली जिल्ह्यात ८५ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली आहे. जालना, बीड, लातूर व नांदेड जिल्ह्यात मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक प्रमाणात रब्बी पेरणी झाली आहे. गतवर्षी मराठवाड्यात ८ लाख १८ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती.
यंदा मराठवाड्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २६ हजार २५२ हेक्टर गृहीत होते. त्या तुलनेत आठही जिल्ह्यात ८ लाख ३३ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील २ लाख १८ हजार तर लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड व हिंगोली या पाच जिल्ह्यातील ६ लाख १४ हजार हेक्टरवरील हरभरा पिकाचा समावेश आहे. कपाशीचे पिक हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला पसंती दिली आहे. त्यामुळे हरभऱ्याची पेरणी टप्प्याटप्प्याने होत आहे.
काही दिवस ढगाळ वातावरण असूनही हरभऱ्यावर तुरळक अपवाद वगळता किड रोगांचा प्रादूर्भाव झाला नसल्याने तुर्त हरभऱ्याचे पिक बरे असल्याचे शेतकरी सांगतात. फूल आणि घाट्याच्या अवस्थेतील हरभऱ्याला पाणी देण्यासाठी तुषार संचाचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे.