अकोला : येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यात हरभऱ्याची एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी अपेक्षित अाहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ३० हजार हेक्टरने हे क्षेत्र अधिक राहू शकते. रब्बी हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असून त्यात हरभरा लागवडीत भरीव वाढ दाखवली अाहे.
या खरीप हंगामात कमी व अनियमित पावसामुळे पिकांची सरासरी ९० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली होती. १० टक्के क्षेत्र लागवडीखाली येऊ शकले नव्हते. अाता हे क्षेत्र रब्बी पिकाखाली येऊ शकते. शिवाय मूग, उडीद काढणी झालेल्या शेतात व काही शेतकरी सोयाबीनची काढणी करूनही हरभरा व इतर रब्बी पिकांची लागवड करीत असतात.
जिल्ह्यात प्रामुख्याने दरवर्षी हरभऱ्याचे क्षेत्र अधिक असते. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ७० हजार ६०० हेक्टर अाहे. त्यात या वर्षी भरीव वाढ होऊन ते एक लाख २२०० हेक्टरपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे पाण्याची शाश्वती नसल्याने गव्हाचे क्षेत्र ३८,२९० हेक्टरवरून ३१ हजार ३०० हेक्टरपर्यंत घसरण्याची शक्यता अाहे.
या हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन केले अाहे. पुढील अाठवड्यापासून रब्बी पिकांची लागवड सुरू होऊ शकते. सप्टेंबरमध्ये थोडाफार पाऊस झालेला असल्याने रब्बीसाठी तो पोषक ठरणार अाहे. शेतकरी त्याचा लाभ घेण्याच्या तयारीला लागले अाहेत. सोयाबीनच्या सोंगणीने वेग घेतला असून, साधारणतः अागामी १५ ते २० दिवसांत रब्बी पेरण्याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट झालेले असेल.