अकोला ः पहिल्यांदा थेट जनतेतून सरपंच निवडून अाणणाऱ्या निवडणुकीचे सोमवारी (ता. ९) निकाल बाहेर अाहे. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्तापालट तर झालाच; शिवाय प्रस्थापितांना हादरे देताना मतदारांनी नवयुवकांकडे सत्तेच्या चाव्या सोपविल्याचे चित्र समोर अाले अाहे.
सोमवारी निकाल लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी दावे-प्रतिदावे करणे सुरू केले. वऱ्हाडात तीनही जिल्हे मिळून ८०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. अकोला जिल्ह्यात २७२ ग्रामपंचायतीचेे निकाल अाल्यानंतर राजकीय पक्षांकडून अाता ग्रामपंचायती ‘हायजॅक’ होताना दिसत आहेत.
थेट सरपंच निवडीमुळे राजकीय पक्षांनी घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला आहे. त्यातही काॅंग्रेस, भाजप, शिवसेनेकडून सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचा दावा केला जात अाहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काही ठिकाणी भारिप-बमसंनेही सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. अकोला जिल्ह्यात २७२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीकडे नागरिकांसोबतच राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते.
प्रत्यक्षात मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यांचे किती उमेदवार आणि कोणत्या ग्रामपंचायतीसाठी उभे आहेत, याबाबत दावा केला नव्हता. परंतु निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांनी दावे सुरू केले. काही पक्षांनी तर थेट माध्यमांपर्यंत त्यांच्या सरपंचाची यादीच पाठवली.
अकोला जिल्ह्यात भाजपने १४६ ठिकाणी विजय मिळवल्याचे म्हटले. भाजपचा हा दावा शिवसेनेने खोडून काढत जिल्ह्यात १०४ पेक्षा अधिक जागांवर शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी निवडून आल्याचे म्हटले. भारिप-बमसंनेही जिल्ह्यात ८८ पेक्षा अधिक जागांवर पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला. काँग्रेसने तर सर्वाधिक १५० ग्रामपंचायतींमध्ये पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सरपंच झाल्याचे म्हटले.
बुलडाणामध्ये भाजपचा १३० ग्रामपंचायतींवर दावा
बुलडाणा जिल्ह्यात भाजपने १३० ग्रामपंचायतींवर दावा केला. काँग्रेसनेही बहुतांश ठिकाणी यश मिळाल्याचे म्हटले. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही घाटावर जोरदार बाजी मारल्याचे म्हटले. शिवसेनासुद्धा दावा करण्यात अाघाडीवर होती. वाशीम जिल्ह्यात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंचपदाबाबत दावे करण्यात येत अाहेत. एकूणच या निवडणुकीचा कल पाहिला असता मतदारांनी नवीन शिलेदारांना निवडून दिले. त्यातही प्रस्थापितांना ठिकठिकाणी धक्के बसविले.