नगर ः थेट सरपंच जनतेतून निवडल्याचा नगर जिल्ह्यामध्ये तरुणांना फायदा झाला आहे. अनेक ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन लोकांनी तरुणांना संधी दिली आहे. जिल्ह्यामध्ये बहुतांश भागांत नेत्यांनी आपापल्या भागात वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र आहे.
मात्र कोणत्याही पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणुका लढवल्या गेल्या नसल्या तरी सर्व पक्षांत आपण ‘नंबर वन’ असल्याचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत.
नगर जिल्ह्यात २०५ ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यात निवडणुका होत्या. त्यापैकी दहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद बिनविरोध झाले. उर्वरित १९५ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासह सदस्यपदासाठी निवडणुका झाल्या.
या वेळी पहिल्यांदाच सरपंच जनतेतून निवडला गेल्याने सदस्यांपेक्षा सरपंचपदावर नेत्यांसह गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. या झालेल्या निवडणुकांत अनेक ठिकाणी सरपंच एका गटाचा आणि सदस्य दुसऱ्या गटाचे निवडून आल्याचे चित्र आहे. बऱ्याच तालुक्यांत मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे.
अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड, नगर तालुक्यात आमदार शिवाजी कर्डीले, नेवासा तालुक्यात आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख, श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार राहुल जगताप, पारनेरमध्ये आमदार विजय औटी, कोपरगावात आमदार स्नेहलता कोल्हे व माजी आमदार अशोक काळे, राहात्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी तालुक्यात शिवाजी कर्डीले, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह, पाथर्डी- शेवगावात माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, आमदार मोनिका राजळे, जामखेडमध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे, संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यांसह त्या-त्या तालुक्यातील नेत्यांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत आपले वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट केले.
निवडणुकांतील महत्त्वाची वैशिष्ट्ये
जिल्हा परिषद, पंचायत समितीत पराभूत झालेले ग्रामपंचायतीत विजयी अनेक गावांत प्रस्थापितांना धक्का देत तरुणांची राजकारणात ‘एंट्री’ एकाच ठिकाणी अनेक पक्षांचे सत्तेचे दावे अनेक ठिकाणी सरपंच एका गटाचा, सदस्य दुसऱ्या गटाचे बहुतांश ठिकाणी सत्ता परिवर्तन काही सरपंचांचा राजकीय नाव लावण्याला विरोध