द्राक्ष बाजारात गुणवत्तेचा मुद्दा कळीचा

द्राक्ष बाजारात गुणवत्तेचा मुद्दा कळीचा
द्राक्ष बाजारात गुणवत्तेचा मुद्दा कळीचा

राज्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यात यंदा ३० ते ३५ टक्के उत्पादन कमी राहणार आहे. या स्थितीत चांगली गोडी असलेल्या उच्च गुणवत्तेच्या मालाला वाढती मागणी राहील. पाऊस, थंडी, वातावरणातील बदल, साधारण दर्जाचा माल ही आव्हाने ही द्राक्ष बाजारासमोर आहेत. याची चुणूक अर्लीच्या द्राक्षांनी दाखवली. नाशिक भागातील कळवण, सटाणा, मालेगाव या भागातील द्राक्षांना ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये पावसाचा फटका बसला. या भागातील ८० टक्के हंगाम आटोपला आहे. या बरोबरच नाशिक भागातील चांदवड, सिन्नर, सांगली भागातील वाळवा, मणेराजुरी, सोनी, इस्लामपूर या परिसरातील खुडे सुरू आहेत. या द्राक्षांना दिल्ली मार्केटसाठी प्रतिकिलो ५० ते ७० रुपये दर मिळत आहे. रंगीत वाणांना हा दर ९० रुपयांपर्यंत आहे. रशियाला आतापर्यंत २५०० टन माल निर्यात झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलो ६० ते १०० रूपये व सरासरी ७५ रुपये दर मिळत आहे. डिसेंबर २०१७ च्या अखेरपर्यतंचं हे चित्र आहे. नवीन वर्षात जानेवारी पासून बाजार उठाव घेईल अशी चिन्हे आहेत. द्राक्षाची गुणवत्ता म्हणजे गोडी हाच यंदाच्या हंगामाचा कळीचा मुद्दा राहील, असाच सूर या क्षेत्रातील जाणकारांमधून उमटतो आहे. पिंगळवाडे (बागलाण) येथील प्रयोगशील द्राक्षउत्पादक नामदेव भामरे यांच्या द्राक्षबागेची खुडणी अंतिम टप्प्यात आहे. ग्राहकाला आवडतील अशी गोड चवीची द्राक्ष उत्पादन करण्यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. त्यामुळे १९९० पासून त्यांची द्राक्षे दिल्लीच्या बाजारात सरासरीपेक्षा चांगल्या दराने विकली जातात. भामरेंसारख्या काही द्राक्ष उत्पादकांनी अशा पध्दतीने देशांतर्गत बाजारात जम बसवला आहे. यंदाच्या प्रतिकूल वातावरणातही त्यांना चांगला दर मिळाला. मात्र ज्या द्राक्ष उत्पादकांनी कमी ब्रीक्‍स शुगरचे माल बाजारात पाठविले, त्यांना दरात फटका बसला. त्यामुळे एकूणच बाजारावरही परिणाम झाला. चालू हंगामात द्राक्ष दरात ३० ते ४० टक्‍के घट दिसून आली. येत्या काळात विशेषत: जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षाला मागणी वाढणार आहे. मात्र त्यातही किमान २० ब्रिक्‍स साखर गोडीची द्राक्षे बाजारात आली तर हा उठाव दीर्घकाळ टिकून राहील असे भामरे यांनी सांगितले.  राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली विभागाचे अध्यक्ष शिवलिंग संख म्हणाले, की सांगली विभागातील २५ टक्के द्राक्ष वाळवा, मणेराजुरी, सोनी या भागातील असून ती आता बाजारात आहेत. बांगलादेशसह कर्नाटक मधील व्यापाऱ्यांकडून त्यांना चांगली मागणी होत आहे. उर्वरित ७५ टक्के द्राक्षांपैकी निम्मी बेदाण्यासाठी तर निम्मी निर्यातीसाठी जातात. यंदा बेदाण्याकडे तुलनेने कल कमी आहे. परिणामी बेदाणा व खाण्याच्या द्राक्षांनाही मागणी वाढली आहे. जानेवारीत दरात अजून २० टक्‍क्‍यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

खरेदीदारांची पत तपासण्याची गरज  द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांनी सांगितले, की देशांतर्गत बाजारासाठी तसेच निर्यातीच्या बाजारासाठी द्राक्ष देताना शेतकऱ्यांनी खरेदीदार व्यापाऱ्यांची नीट माहिती घ्यावी. त्याची पत नीट तपासूनच माल दिला पाहिजे. कमी साखरेचा साधारण दर्जाचा माल मागणाऱ्या व्यापाऱ्याला माल देऊ नये. गोड चवीच्या बाबतीत खरेदीदार व व्यापारी या दोघांनीही तडतोड करु नये. ही पथ्ये पाळली तर नुकसान टळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com