सांगली ः सांगली जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी (ता. १५) रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील येळावी, तुरची, निमणी, बुरुंगवाडी, जुळेवाडी, यासह पलूस तालुक्यातील काही भागांत सुमारे अर्धा तास गारपीट झाली. यामुळे या सर्व भागांतील दोन ते सव्वादोन हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील तासगाव व सांगली शहरात बुधवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजेदरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यातील तासगाव आणि पलूस तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर अचानक गारपीट सुरू झाली. त्यानंतर सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. द्राक्षाची खरड छाटणी झाली असून, फुटवे चांगले फुटले होते. काड्या परिपक्व झाल्या होत्या. गाटपीट झाल्याने काड्या तुटून जमिनीवर पडल्या होत्या.
तासगाव आणि पलूस तालुक्यातील सुमारे दोन ते सव्वादोन हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागा बाधित झाल्या आहेत. द्राक्षाची परत छाटणी घ्यावी लागेल अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. मात्र, परत छाटणी घ्यायची झाली तर त्यासाठी उष्णता लागते. पुढे पावसाळा आला असल्याने परत छाटणी घेणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात उत्पादन मिळेल याची शाश्वती नाही.
गारपीट झाली असल्याची माहिती मिळताच राज्य द्राक्ष बागायदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन पाहणी केली. यामध्ये किती क्षेत्र बाधित झाले आहे, याची माहिती संकलन करणे सुरू आहे.
तासगाव तालुक्यात गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे याचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. मात्र, गारपीट झाल्याची माहिती कृषी विभागाला कशी मिळाली नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. माहिती जरी मिळाली असली तरी कृषी विभागाचे अधिकारी नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी करण्यासाठी आलेच नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.