सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढ

जिल्ह्यातील द्राक्षाला देशांतर्गत तसेच परदेशातूनही मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील द्राक्षाचे एकूण क्षेत्र किती आहे, याबाबतचा सर्व्हे आम्ही करणार आहोत. - सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ.
द्राक्ष लागवड क्षेत्र वाढले
द्राक्ष लागवड क्षेत्र वाढले

सांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुढाकार घेऊ लागले आहेत. गोड आणि रसाळ द्राक्षाला देशांतर्गत आणि परदेशात मागणी वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत द्राक्षाच्या क्षेत्रात सुमारे १० ते १५ हजार एकरांनी वाढ झाली असल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी द्राक्षाचे क्षेत्र एक लाख ते एक लाख पाच हजार एकरांपर्यंत होते. दोन वर्षांत हे क्षेत्र सुमारे १ लाख ते एक लाख २५ हजार एकरपर्यंत पोचले आहे. गेल्या दोन वर्षांत द्राक्षाला चांगले दर मिळाले. येथील शेतकरी दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. व्यापारीदेखील येथील द्राक्षांना पसंती देत आहेत. द्राक्ष खरेदीसाठी बांगलादेशासह, उत्तर भारत, जम्मू काश्मीर, बिहार, पंजाब येथील व्यापारी सांगलीत येऊ लागले आहेत. खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त असल्याने दराबाबत स्पर्धा निर्माण होऊन अधिक दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकरीदेखील द्राक्ष विक्रीस प्राधान्य देऊ लागले आहेत. परिणामी जिल्ह्यातील द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

आटपाडी तालुक्‍यात द्राक्ष पीक वाढू लागले आटपाडी हा दुष्काळी तालुका आहे. पाणीटंचाईमुळे येथे कमी पाण्यावर डाळिंब पीक घेतले जाते. गेल्या दोन वर्षांपासून टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन वेळेत मिळू लागले आहे. पाणी आल्याने डाळिंबाबरोबर द्राक्षाची लागवड करण्यासाठी शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत. तालुक्‍यात सुमारे शंभर हेक्‍टरवर द्राक्षाची लागवड झाली आहे.

कृषी विभागाकडे जुनीच आकडेवारी जिल्ह्यातील द्राक्षाचे एकूण क्षेत्र २१ हजार हेक्‍टर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. द्राक्ष संघाकडे मात्र ही नोंद एक लाख एकर अशी आहे. कृषी विभागाकडील द्राक्षाची असणारी आकडेवारी जूनी असल्याचे दिसते आहे. मुळात द्राक्षाचे क्षेत्राची नोंद कृषी कार्यालय आणि तलाठी यांच्या मार्फत केली जाते. मात्र, दरवर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून द्राक्षाच्या क्षेत्राच्या आकडेवारीत कोणतेच बदल होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कृषी विभागातील अधिकारी काय करतात, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

आटपाडी तालुक्‍यात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले आहे. त्यामुळे शेतीला शाश्‍वत पाण्याची सोय झाली असल्याने नव्याने द्राक्ष लागवड केली असल्याचे आटपाडी येथील शेतकरी  गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com