मराठवाड्यातील भूजल रसातळाला

पाणी पातळी
पाणी पातळी

औरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने रसातळाला जात असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर २०१८ अखेर सरासरी १.७३ मीटर खोल गेलेली भूजलाची पातळी जानेवारी २०१९ अखेर सरासरी २.७८ मीटरने खालावली आहे. ८७५ विहिरींच्या निरीक्षणाअंती हे चित्र समोर आले असून, त्यामध्ये ६९ तालुक्‍यांतील भूजलपातळीत घट, तर त्यापैकी २४ तालुक्‍यांतील घट तीन मीटरपेक्षा जास्त असल्याने या तालुक्‍यांमधील जलसंकट अधिक गडद झाले आहे.  मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांतील भूजलाचे सर्वेक्षण करण्यासाठी जानेवारीअखेर ८७५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणातून परभणीतील दोन व नांदेडमधील सहा तालुक्‍यांतील भूजलात गत पाच वर्षांतील जानेवारीअखेरच्या सरासरी भूजलपातळीच्या तुलनेत ० ते १ मीटरपर्यंत घट नोंदली गेली आहे.   जालना, हिंगोलीतील प्रत्येकी एक, नांदेडमधील सहा, लातूरमधील चार तर परभणीमधील दोन तालुक्‍यांतील भूजलपातळीत १ ते २ मीटरपर्यंतची घट नोंदली गेली आहे. १९ तालुक्‍यांतील भूजल पातळीत २ ते ३ मीटरपर्यंत घट नोंदली गेली असून, त्यामध्ये औरंगाबाद व लातूरमधील प्रत्येकी चार, जालन्यातील पाच, हिंगोलीतील दोन, बीडमधील तीन व परभणीमधील एका तालुक्‍याचा समावेश आहे.  औरंगाबादमधील पाच, उस्मानाबादमधील सर्व आठ, बीडमधील चार, लातूर, हिंगोली व जालन्यातील प्रत्येकी दोन तसेच परभणी जिल्ह्यातील एका तालुक्‍यातील भूजलपातळी तीन मीटरपेक्षा जास्त खालावली असल्याचे विहिरींच्या निरीक्षणाअंती समोर आले आहे. विहिरींचे हे निरीक्षण यंदाचे दुष्काळाचे संकट किती भीषण असेल याचा अंदाज देण्यास पुरेसे आहे. औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांतील भूजलपातळीत तीन मीटरपेक्षा जास्त झालेली घट चिंता वाढविणारी आहे. 

० ते १ मीटरपर्यंत घट झालेले तालुके  परभणी, जिंतूर, अर्धापूर, भोकर, उमरी, लोहा, किनवट, हिमायतनगर 

१ ते २ मीटरपर्यंत घट झालेले तालुके  घनसावंगी, पुर्णा, गंगाखेड, कळमनुरी, नांदेड, मुदखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, मुखेड, औसा, अहमदपूर, उदगीर, देवणी, बीड, आष्टी, परळी, वडवणी. 

२ ते ३ मीटरपर्यंत घट झालेले तालुके  औरंगाबाद, सोयगाव, गंगापूर, खुलताबाद, जालना, बदनापूर, मंठा, अंबड, सोनपेठ, हिंगोली, सेनगाव, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, चाकूर, पाटोदा, केज, अंबाजोगाई.   ३ मीटरपेक्षा जास्त घट झालेले तालुके  फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, भोकरदन, परतूर, सेलू, वसमत, औंढा नागनाथ, लातूर, जळकोट, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, परांडा, कळंब, भूम, गेवराई, शिरूर कासार, धारूर, माजलगाव. 

 पर्जन्यमानात तूट  मराठवाड्यात यंदा सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ऑक्‍टोबरअखेर ११ तालुक्‍यात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तूट आली आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील खुलताबाद, गंगापूर, पैठण, नांदेडमधील देगलूर, उस्मानाबादमधील उस्मानाबाद, भूम व परांडा तर बीड जिल्ह्यातील बीड, शिरूर कासार, गेवराई व धारूर या तालुक्‍यांचा समावेश आहे. ४४ तालुक्‍यांत ३० ते ५० टक्‍के, ७ तालुक्‍यात २० ते ३० टक्‍के तर १२ तालुक्‍यात २० टक्‍क्यांपर्यंत तूट नोंदली गेली आहे.  चिंता वाढविणारे तालुके व गत पाच वर्षांच्या तुलनेत घटलेली भूजलपातळी (मीटरमध्ये)  उस्मानाबाद जिल्हा  वाशी ...८.३०  परांडा ...६.३६  लोहारा....५.७९  उस्मानाबाद..४.८९  कळंब... ४.४३  उमरगा...४.३८  भूम ...४.०९  तुळजापूर..३.४५  बीड जिल्हा  गेवराई ...४.७३  धारूर ...४.१६  शिरूर कासार...३.९३  माजलगाव...३.९०  लातूर जिल्हा  जळकोट ...३.८६  लातूर ...३.५१  हिंगोली जिल्हा  वसमत ...३.५१  औंढा नागनाथ...३.१८  परभणी जिल्हा  सेलू.....४.५०  जालना जिल्हा  भोकरदन ..४.१९  परतूर ...३.३१  औरंगाबाद जिल्हा  कन्नड...४.३६  पैठण....४.१६  सिल्लोड..४.०५  फुलंब्री...३.७४  वैजापूर ...३.३१  जिल्ह्यानिहाय भूजलपातळी (मीटरमध्ये)

जिल्हा विहिरी ५ वर्षांतील सरासरी जानेवारी
औरंगाबाद १४१ ९.५० १२.७७ 
जालना ११० ७.४० १०.१६ 
परभणी ८६ ९.१६ १०.२१
हिंगोली ५५ ५.७९ ८.४४ 
नांदेड १३४ ७.२१ ७.७८ 
लातूर १०९ ६.०६ ८.३४ 
उस्मानाबाद ११४ ६.३५ ११.५६ 
बीड १२६ ७.०८ ९.८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com