रावेर, जि. जळगाव ः केळी पिकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, यावल आणि चोपडा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात दरवर्षी भूजल पातळी एक मीटरने घसरू लागली आहे.
गेल्या दहा वर्षांत या तालुक्यातील ‘डार्क झोन’मध्ये असलेल्या गावांच्या संख्येत झालेली वाढ चिंताजनक असून, पाणी पातळी उंचावण्यासाठीचे उपाय फारसे प्रभावी व व्यापक नसल्याने अडचणी वाढत आहेत. तापी नदीवर प्रस्तावित खारिया गोटी (मध्य प्रदेश) येथील महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प तातडीने सुरू करावा, अशी मागणीही यानिमित्त पुढे आली आहे.
रावेर, यावल आणि चोपडा हे तीनही तालुके सातपुड्याच्या कुशीत वसलेले आहेत. सातपुड्यातून उगम पावलेल्या नागोई, भोकरी, सुकी, मात्राण, मोर, हडकाई, खडकाई, अनेर या नद्या आणि असंख्य नाल्यांमुळे या भागातील भूजल पातळी बरीच वर होती. पाण्याच्या दृष्टीने हा भाग सुजलाम् सुफलाम् असल्याने या भागास महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हटले जात होते.
गेल्या वीस वर्षांत केळी पिकासाठी पाण्याचा भूगर्भातून झालेला भरमसाट उपसा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, पाणी अडवा-पाणी जिरवा या योजनेकडे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, यामुळे या भागातील भूजल पातळी हळूहळू खाली घसरली आहे. गेल्या ३० वर्षात ही भूजल पातळी दुप्पटीने खालावली आहे. रावेरात तर १९६२ पासून विहिरींमधून पाणी उपसा सुरू आहे.
या भागात विहिरींची पाणीपातळी १९९० च्या सुमारास सरासरी शंभर फुटांवर होती, ती आता सरासरी दोनशे फुटांच्या खाली गेली आहे. कूपनलिकांना जिथे दीड-दोनशे फुटांवर मुबलक पाणी लागायचे, तिथे आता चार-पाचशे फुटांवर पाणी लागेल, याचीही खात्री राहिलेली नाही.
या तीन तालुक्यांत भूजल घसरली, हे खरे आहे. पण या तालुक्यांतील बहुसंख्य गावे ‘डार्क झोन’ म्हणून जाहीर करण्यात आल्याने नव्या विहिरी, कूपनलिकांवर बंधने आली आहेत.
पर्यायाने पाण्याचा उपसा काहीसा कमी झाला आहे. पण पुनर्भरणाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने ‘डार्क झोन’मधील गावांची संख्या २००८ च्या तुलनेत २०११ मध्ये वाढली आहे. तथापि या तीनही तालुक्यांत अजूनही उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर लागत नाही. किरकोळ अपवाद वगळता विहीर अधिग्रहीत करावी लागत नाही किंवा एखाद्या गावाला तीव्र पाणीटंचाई भासत नाही.