नगर जिल्ह्यातील भूजलपातळीत यंदा सात मीटरने वाढ

जलयुक्त शिवार अभियानातून लोकसहभागाने चांगली कामे होत आहेत. त्याचा परिणाम यंदा वाढलेल्या भूजलपातळीतून दिसत आहे. अडवलेले पाणी जिरण्याला मदत झाल्याने यंदा मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत जास्त म्हणजे सात मीटरने भूजलपातळी वाढली आहे. उन्हाळी पिकांना यामुळे पाणी उपलब्ध होणार आहे. - पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर.
भूजल पातळीत वाढ
भूजल पातळीत वाढ

नगर ः जलयुक्त शिवार योजनेसह अन्य योजनांतून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे नगर जिल्ह्यामधील भूजल पातळीत यंदा तब्बल सात मीटरने वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. चार वर्षांपूर्वी यंदा एवढाच पाऊस पडला होता. त्यावर्षी मात्र ३.२ मीटरने पाणीपातळी वाढली होती. त्यामुळे दोन वर्षांत केलेल्या कामाचे फलित यंदा दिसत आहे. 

टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासह टॅंकरमुक्तीसाठी शासनाने सर्व सिंचन योजना एकत्र करुन २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पाणी अडवून ते जिरवण्यावर भर देत लोकसहभागातून गाळ काढण्यासह अन्य कामांना या योजनेत प्राधान्य दिले गेले. दोन वर्षांनंतर या कामाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. योजनेतून राज्यात सर्वाधिक तलावातील गाळ नगर जिल्ह्यामध्ये काढला गेला आहे.
‘जलयुक्त’मधून नव्याने कामे करण्याबरोबरच जुन्या कामांच्या दुरुस्तीलाही प्राधान्य दिले जात आहे. तलावातील गाळ काढून शेतात टाकला, तर शेती सुपीक होते आणि तलावात पाणीसाठा वाढतो याबाबत जागृती करत लोकांची मदत घेतल्याने गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. दोन वर्षांत लोकसहभाग, महात्मा फुले जलभूमी अभियान आणि जलयुक्त अभियानातून १६९८ तलावांतून तब्बल ८८ लाख ३४ हजार ४१० घनमीटर गाळ काढला गेला आहे. या सर्व कामांची किंमत २२ कोटी रुपये आहे.
जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभागाला प्राधान्य दिले जात आहे. आपल्या विकासासाठी आपणच काम करायचे, असे समजून लोकसहभाग वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदाही चांगला झाला आहे. 
‘जलयुक्त’मधून दोन वर्षांत तब्बल ६५५ तलावांतील गाळ काढला आहे. त्याची सरकारी दराने सतरा कोटी ५६ लाख ९३ हजार रुपये किंमत होते. त्या तलावात यंदा जवळपास पाच हजार टीसीएम पाणीसाठा झाला आहे. तेथे पाणी अडवून ते जिरवण्यात येत असल्याने भूजलपातळी वाढीला मोठी मदत होत आहे.
यंदा भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार दहा मीटरवर गेलेली पाणीपातळी आता सात मीटरने वर आली आहे. दोन वर्षांपूर्वी जेवढा पाऊस झाला होता, तेवढाच पाऊस यंदाही झालेला आहे. मात्र यंदा पाणी अडवल्याचे प्रमाण अधिक असल्याने भूजलपातळी उंचावण्याला मदत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार पाथर्डी तालुक्‍यातील प्रभुपिंप्री येथे भूजल पातळी सतरा मीटरवर होती, ती यंदा साडेचार मीटरवर आहे. संगमनेर तालुक्‍यातील सारोळे पठार येथील साडेतेरा मीटरवर असलेली भूजलपातळी चार मीटरवर आली आहे. अकोले, शेवगाव, राहाता, नगर, पारनेर भागात भूजलपातळी वाढण्यासही यंदा मोठी मदत झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com