नगर ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानातून नगर जिल्ह्यामध्ये ११ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाचे उन्हाळी बीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी चौदा तालुक्यांत ५ हजार ९२९ क्विंटल अनुदानावर बियाणे वितरण केले असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
तेलबियांचे उत्पादन वाढावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी ‘एसबी-२ व टीएजी- २४’ बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाणार आहेत. एका एकरासाठी पेरणीला चाळीस किलो बियाणे लागत असले, तरी ग्राम बीजोत्पादनासाठी दिले जाणारे बियाणे टोकन पद्धतीने वापरायचे आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला एका एकरासाठीच वीस किलो बियाण्यांवर अनुदान मिळेल.
राज्यभरातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ‘एसबी-२’चे ५ हजार नऊशे २० क्विंटल तर ‘टीएजी-२४’चे पंधरा हजार २२८ क्विंटल, असे २१ हजार १८४ क्विंटल बियाणे महाबीजने पुरवले आहे. सर्वासाठी बियाणे उपलब्ध असले तरी अल्प, अत्यंल्प भूधारक, अनुसूचित जाती-जमाती, महिला यांना प्राधान्य दिले जात आहे.
राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये २१ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी २१ हजार १४८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला आहे. एका शेतकऱ्याला एका एकरापर्यंत (वीस किलो) बियाणे साठ टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत.
राज्यात सर्वाधिक क्षेत्र नेहमीप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अकरा हजार आठशे ५८ हेक्टर क्षेत्रावर हा उपक्रम राबवला जात आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी सांगितले.