रेशीम वाढीस प्रयत्न व्हावेत : पणनमंत्री

रेशीम वाढीस प्रयत्न व्हावेत : पणनमंत्री
रेशीम वाढीस प्रयत्न व्हावेत : पणनमंत्री

पुणे : मराठवाडा आणि विदर्भ हे विभाग आर्थिकदृष्‍ट्या मागासलेले आहेत. या भागातील बागायती क्षेत्र कमी आहे, शेतीचे उत्‍पादन कमी आहे, मालाला भाव, कर्जपुरवठा अशा अडचणींवर मात करत शेती केली जाते. रेशीम व्‍यवसाय हा फायदेशीर ठरणारा असून, शेतकऱ्यांच्‍या आत्‍महत्‍येवर तो प्रभावी उपाय ठरेल. मराठवाडा आणि विदर्भ हे केंद्रबिंदू मानून या भागात रेशीम उद्योगवाढीसाठी प्रयत्‍न व्‍हावेत, असे मत पणन व वस्‍त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

महारेशीम अभियानाचा राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार वितरण समारंभ यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे बुधवारी (ता. २७) आयोजित केला होता. त्या वेळी श्री. देशमुख बोलत होते. या वेळी वस्‍त्रोद्योग विभागाचे अपर मुख्‍य सचिव उज्ज्‍वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे, प्रादेशिक रेशीम सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे आदी उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख यांच्‍या हस्‍ते राज्‍यातील सर्वोत्तम प्रादेशिक विभागाचा पुरस्‍कार औरंगाबादचे सहायक संचालक दिलीप हाके, राज्‍यस्‍तरीय सर्वोत्‍कृष्‍ट जिल्‍हा पुरस्‍कार औरंगाबादचे रेशीम विकास अधिकारी बी. के. सातदिवे यांना देण्यात आला. याशिवाय पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, बार्टीच्‍या प्रकल्‍प संचालक प्रज्ञा वाघमारे, औरंगाबादचे क्षेत्र सहायक एम. पी. साळुंखे, समतादूत श्‍याम गंगाधर, हिंगोलीचे रेशीम विकास अधिकारी जी. एस. ढावरे, अमरावतीचे सहायक संचालक एम.बी. ढवळे यांचाही पुरस्‍कार देऊन गौरव करण्‍यात आला.

सहकार व वस्‍त्रोद्योगमंत्री श्री. देशमुख म्‍हणाले, शेती व्‍यवसाय फायदेशीर व्‍हावा, यासाठी शासन प्रयत्‍नशील असून, शेतकऱ्यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी रेशीम शेती प्रभावी उपाय ठरेल. महाराष्‍ट्र हे रेशीम व्‍यवसायात देशात एक क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावे. बार्टीच्‍या समतादूतांच्‍या मदतीने रेशीम व्‍यवसायाची माहिती शेवटच्‍या शेतकऱ्यापर्यंत पोचवण्‍यास मदत झाल्‍याचा गौरवपूर्ण उल्‍लेख करू.

श्री. देशमुख यांनी रेशीम व्‍यवसायात महाराष्‍ट्र हे देशातील एक क्रमांकाचे राज्‍य बनवण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले. गतवर्षीचे उद्दिष्‍ट पूर्ण झाले असून, यंदा तीस हजार एकर रेशीम लागवडीचे उद्दिष्‍ट डोळ्यासमोर ठेवून ते साध्‍य करण्‍याचेही त्‍यांनी आवाहन केले.

बार्टीचे महासंचालक कैलास कणसे म्हणाले, की बार्टीच्‍या समतादूतांच्‍या माध्‍यमातून रेशीम संचालनालयाशी जोडले गेले आहे. शेतकऱ्यांच्‍या जीवनात सकारात्‍मक बदल घडवण्‍यात यश मिळत आहे. देशात रेशीम उद्योगात महाराष्‍ट्र एक क्रमांकावर आणण्‍यासाठी सहकार्य करू.

वस्‍त्रोद्योगचे अपर मुख्‍य सचिव उज्ज्‍वल उके म्हणाले, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि समतादूतांच्‍या एकत्रित समन्‍वयाने रेशीम लागवडीचे उद्दिष्‍ट साध्‍य झाले. भविष्‍यातही याच उत्‍साहाने उद्दिष्‍टपूर्ती होईल. त्यासाठी बार्टीच्या समतादूतांची मदत घेतली जाईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्‍हा रेशीम अधिकारी गणेश राठोड यांनी केले. रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com