विदर्भात आज गारपिटीचा इशारा

विदर्भात आज गारपिटीचा इशारा
विदर्भात आज गारपिटीचा इशारा

पुणे : उन्हाच्या चटकात होरपळणाऱ्या राज्याला पूर्वमोसमी वादळी पावसाने झोडपले आहे. जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने द्राक्ष, आंबा, कांदा, गव्हासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. सोमवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिक, पुणे, नगर, सातारा, परभणी, हिंगोली पूर्वमोसमीच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. आज (ता.१६) राज्यात वादळी पावसाची शक्यता असून, विदर्भात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून चौघांचा मृत्यू, तसेच द्राक्ष, आंबा, कांद्याचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर, येवला, निफाड, इगतपुरी, चांदवड, देवळा तालुक्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. अंगावर वीज पडल्याने चार ठिकाणी पशुधन मृत्युमुखी पडले. अवकाळी पावसामुळे शेतात, कांदाचाळीत साठविण्यात आलेल्या कांद्याला फटका बसणार आहे. काढणी अंतिम टप्प्यात असलेला गहू, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. आंब्याचा मोहर, कैऱ्या गळाल्या. दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे तीन युवकांचा, तर चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथे एका महिलेचा मृत्यू झाला. नाशिक तालुक्यातील पिंपळद येथे दोन, शिवणई (ता. दिंडोरी) येथे एक गाय, तर येवल्यातील देवठाण एक गाय ठार झाली. पुणे जिल्ह्यात दुपारी व रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाने सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे आंबा, कांदा आणि कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने कमी अधिक स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. सायगाव, आनेवाडी, लिंब परिसरात झालेला पाऊस उन्हाळी पिकांना लाभदायक ठरणार आहे. नगरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची हजेरी लावली. कोहकडी परिसरात वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर पावसामुळे कांदा उत्पादकांची धावपळ उडाली. मराठवाड्यातील परभणी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांतील काही भागांत, तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा तालुक्यातील काही गावशिवारात वादळी वारे, विजांच्या कडकडात हलका पाऊस झाला. वेगवान वाऱ्यामुळे फळपिकांचे नुकसान झाले.  सोमवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.९ (२.३), धुळे ४२.२, जळगाव ४३.२ (१.९), कोल्हापूर ३८.० (०.९), महाबळेश्वर ३३.९ (१.९), मालेगाव ४२.४ (२.५), नाशिक ३९.८ (२.२), सांगली ३९.६ (२.१), सातारा ३८.८ (२.१), सोलापूर ४२.१(२.१), डहाणू ३५.० (२.५), सांताक्रूझ ३४.५ (१.९), रत्नागिरी ३५.२ (३.२), औरंगाबाद ४१.७ (३.२), बीड ४२.८ (३.५), नांदेड ४३.० (२.०), उस्मानाबाद ४०.५ (२.२), परभणी ४३.८ (३.३), अकोला ४४.८ (४.१), अमरावती ४४.६ (३.४), बुलडाणा ४१.६ (४.३), बह्मपुरी ४४.७ (४.२), चंद्रपूर ४५.० (३.६), गोंदिया ४१.२ (१.०), नागपूर ४४.२ (३.७), वर्धा ४३.९ (२.८), यवतमाळ ४३.० (२.७).  विदर्भ भाजला; तापमान ४५ अंशांवर राज्यात वाढलेला उन्हाचा चटका कायम आहे. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर येथे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेल्याने विदर्भ अक्षरश: भाजून निघले आहे. चंद्रपूर येथे उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील वर्धा यवतमाळ, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाचा ताप कायम राहण्याबरोबरच विदर्भात आज (ता.१६) उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com