मराठवाड्यात एक लाख ४७ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

गारपिटीने नुकसान
गारपिटीने नुकसान

औरंगाबाद  : मराठवाड्यात फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १ लाख ४७ हजार २०७ हेक्‍टरवरील सर्व पिकांचे ३३ व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे प्रशासकीय पंचनाम्याअंती समोर आले आहे. या संदर्भात मदतीसाठी विभाग स्तरावरून शासनाला जवळपास १३० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. प्राथमिक अंदाजात १ लाख ९६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली होती. या संदर्भात शासनाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्‍तांना पत्र पाठवून ३३ टक्‍के ते ५० टक्‍के व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राची वर्गवारी स्वतंत्रपणे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. चार दिवसांत हा अहवाल पाठविण्याचेही कळविण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांतील नुकसानीचा अहवाल विभाग स्तरावरून शासनाला सादर करण्यात आला आहे.

त्यामध्ये ३३ टक्‍के ते ५० टक्‍के नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये जिरायत, बागायत व फळपिके मिळून ७८ हजार ६२६.३९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. या नुकसानभरपाईपोटी जिरायतीकरिता ६८०० रुपये प्रतिहेक्‍टरीप्रमाणे ४० कोटी ५४ लाख, बागायतीसाठी १३,५०० रुपये प्रतिहेक्‍टरीप्रमाणे २१ कोटी ९३ लाख, तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्‍टरीप्रमाणे ४ कोटी  ९७ लाख ९ हजार रुपये, असे एकूण ६७ कोटी ४४ लाख २७ हजारांची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ६८ हजार ५८१ हेक्‍टरवरील पिकांसाठी जिरायतकरिता ६८०० प्रतिहेक्‍टरप्रमाणे ३१ कोटी ३५ लाख ५५ हजार, बागायतीसाठी २५ कोटी ५८ लाख १२ हजार, तर फळपिकांसाठी हेक्‍टरी १८ हजार प्रमाणे ६ कोटी ३३ लाख ८० हजार रुपये, असे एकूण ६३ कोटी २७ लाख ४७ हजार  नुकसानभरपाईची रकमेची आवश्‍यकता पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जवळपास ६१ हजार हेक्‍टरवरील रब्बी ज्वारीचे, तर १८ हजार ४५५ हेक्‍टवरील हरभरा पिकाचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विभाग स्तरावरून शासनाला अपेक्षित नुकसानीची माहिती कळविण्यात आली आहे. आता शासन किती तत्परतेने मदतीसाठीची पावले उचलते, याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सात जिल्ह्यांतील ४ लाख ५२ हजार ८११ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्‍के ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान नुकसान झालेल्या २ लाख ९४  हजार ५३३ व ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या १ लाख ५८ हजार २७८ शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतील केळी, द्राक्ष, पपई, डाळिंब, मोसंबी, आंबा, चिकू, संत्रा आदी फळपिकांच्या ६२८२ हेक्‍टवरील क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. त्यामध्ये ३३ टक्‍के ते ५०टक्‍के दरम्यान नुकसान झालेल्या ३५२१.११ हेक्‍टरवरील, तर ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या २७६१.५९ हेक्‍टरवरील फळपिकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com