परभणी ः परभणी जिल्ह्यात ११ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या गारपिटीचा तडाखा सहा तालुक्यांतील पिकांना बसला आहे. एकूण २ लाख ९४ हजार ७३१ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ६६ हजार ८६३.७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये ३३ ते ५० टक्के नुकसान झालेल्या ३० हजार १८५.११ हेक्टर आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या ३६ हजार ६७८.६० हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ५८ कोटी ८६ लाख ५० हजार ४४८ रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील ६६ हजार ८६३.७१ हेक्टरवरील जिरायती, बागायती, फळपिके गारपिटीमुळे बाधित झाली आहेत. जिरायती पिकांच्या नुकसानीबद्दल हेक्टरी ६८०० रुपये, बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३,५०० रुपये, फळपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या पाच तालुक्यांतील १ लाख ७ हजार २९१ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ६७८.६० हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये सेलू तालुक्यातील १२२१ शेतकऱ्यांचे ६२५, सोनपेठ तालुक्यातील ४४८ शेतकऱ्यांच्या ४५९, गंगाखेड तालुक्यातील ७१९ शेतकऱ्यांच्या ४७४, पालम तालुक्यातील ४२ हजार ९३२ शेतकऱ्यांच्या २४ हजार ९२८.६०, पूर्णा तालुक्यातील ६१ हजार ९७१ शेतकऱ्यांच्या १० हजार १९२ हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे.
२५ हजार ३००.४० हेक्टरवरील जिरायती पिके, ९९२० हेक्टरवरील बागायती पिके, १४५८ हेक्टरवरील फळपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी ३३ कोटी २२ लाख १० हजार ३२० रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.
जिंतूर, सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या सहा तालुक्यांतील १ लाख ८७ हजार ४४० शेतकऱ्यांचे ३० हजार १८५.११ हेक्टरवरील पिकांचे ३३ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील ३१२७ शेतकऱ्यांच्या १६५० हेक्टरवरील पिके, सेलू तालुक्यातील ३३ हजार २७५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ४४१.११ हेक्टरवरील, सोनपेठ तालुक्यातील २ हजार ५३८ शेतकऱ्यांच्या १ हजार ५८९ हेक्टरवरील, गंगाखेड तालुक्यातील २५ हजार ४३२ शेतकऱ्यांच्या १५ हजार ५०५ हेक्टरवर, पालम तालुक्यातील ६१ हजार ९७ शेतकऱ्यांचे, पूर्णा तालुक्यातील ६१ हजार ९७१ शेतकऱ्याच्या नुकसानीचा समावेश आहे.
यामध्ये २३ हजार ८५२.७१ हेक्टरवरील जिरायती पिके, ५ हजार ५८७ हेक्टरवरील बागायती पिके, ७४५.४० हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे.या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी २५ कोटी १० लाख ४० हजार १२८ रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.