सेवाग्राम परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला.
सेवाग्राम परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला.

विदर्भात पावसाची दमदार हजेरी

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प खेचल्याने विदर्भात दमदार पाऊस पडला. जवळपास महिन्याभराच्या खंडानंतर आलेल्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि देवळी तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मात्र नाशिक, नगरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दडी कायम आहे. त्यामुळे या भागातील खरीप पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आजपासून (ता. २३) राज्यात पाऊस पुन्हा उघडीप देणार आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला आहे.    

‘दाये’ वादळामुळे गुरुवारपासूनच विदर्भाच्या विविध भागात पावसाला सुरवात झाली. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ३० पेक्षा अधिक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर अनेक ठिकाणी ८० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. महिनाभराच्या खंडानंतर सर्वदूर पाऊस नोंदविला गेला. या पावसामुळे कपाशी, तूर, ज्वारी या पिकांना फायदा होणार आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. २५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून पाऊस नसल्याने सोयाबीनला याची सर्वाधिक झळ बसणार आहे. 

पावसाने सर्वाधिक ओढ दिलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पाऊस पडलेल्या भागातील पिकांना मात्र दिलासा मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, हदगाव, माहूर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. परभणी, हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर सायंकाळच्या सुमारास जिंतूर, परभणी, पूर्णा, वसमत तालुक्यात पाऊस झाला. 

खानदेशात शुक्रवारी व शनिवारी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबारात मात्र पावसाने हुलकावणी दिली. पाऊस झालेल्या भागातील कोरडवाहू कापूस, ताग या पिकांना लाभ झाला आहे. पुढे रब्बीसाठीदेखील पोषक वातावरण निर्माण होणार आहे. पूर्वहंगामी कापसाची उमललेली बोंडे ओली होऊन त्यांचे नुकसान झाले असून कापसाचा दर्जा घसरेल. तर कोरडवाहू कापूस, उशिरा पेरलेली ज्वारी, ताग या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात पावसाने हजेरी लावली असली तरी नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप आहे. यामुळे वाढीच्या अवस्थेतील पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या असून, उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.    

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलीमीटर मध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) : 

कोकण : म्हसळा ३२, रामपूर ५०, मालगुंड ४०, बापर्डे ४५, मासुरे ४५, आजगाव ८०, येडगाव ६२, भुईबावडा ४४. 

मध्य महाराष्ट्र : म्हसावद ३१, वरणगाव ३१, पिंपळगाव ३२, रावेर ३७, खिरोदा ५२, खानापूर ३२, सावदा ३०, ऐनपूर ३४, मुक्ताईनगर ३७, अंतुर्ली ४०, कुऱ्हा ४५, घोडसगाव ६८, रिंगणगाव ५५, कासोदा ३५, वाकडी ३८, फत्तेपूर ३२, शेंदुर्णी ३५, पहूर ४०, तोंडापूर ४६, पाळधी ३३, पिंप्री ३५, सोनवद ३२, बोदवड ४६, नांदगाव ४५, करंजी ३०, निगवे ३७, बालिंगा ३४, केनवडे ५१. 

मराठवाडा : चिंचोली ३१, गोळेगाव २५, अजिंठा २४, बोरगाव २५, सोयगाव २४, सावळदबारा २०, बनोटी २३, आळंद २०, भोकरदन २८, आनवा २०, केदारखेडा २२,   जाफराबाद २२, कुंभारझरी २२, किनवट २१, दहेली २५, सेलू ५२, वसमत ७५, कुरुंदा ५२. 

विदर्भ : मलकापूर १०१, निंबा ८१, हातरुण ८०, कुरणखेड १११, धारणी १२३, हरीसळ ११८, धुळघाट १२५, सावळीखेडा १२०, चिखलदरा १९०, सेमडोह १५७, टेंभूरसोंडा ८५, धानोरा ८०, माहुली ९५, चांदूर रेल्वे १०४, गुहीखेड ९५, अमळा ९०, साटेफळा ९६, मोझारी ८३, चांदूरबाजार १३०, बेलोरा १००, तळेगाव ८१, धानोरा ११३, वडकी ९८, वर्धा ११७, वायफड १२३, सिल्लोड १६९, वायगाव १२३, सेवाग्राम १२१, तळेगाव १३८, सेलू ९८, झाडसी ८१, केळझर ८६, शिंदी ८६, देवळी १४४, पुलगाव १६६, भिडी १३०,  गिरोली २००, हिंगणघाट २४०, वाघोली २२५, सावळी २५२, कानदगाव २४६, वडनेर १९७, पोन्हा १९०, अल्लीपूर २४०, सिरसगाव २२०, समुद्रपूर ९१, निंदोरी १००, खांढळी १००, मंडगाव ८८, नंद १०२, शहापूर ८२, वरोरा १३०.  तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज  ‘दाये’ चक्रीवादळ निवळल्यानंतर शनिवारी मध्य प्रदेशात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. हे कमी दाबक्षेत्र उत्तरेकडे सरकून हळूहळू विरून जाणार आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्‍मीर, राजस्थान, उत्तर प्रदेशात पाऊस पडणार आहे. आजपासून (ता. २३) राज्यात पाऊस पुन्हा ओसरणार असून, कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  वर्धा जिल्ह्याला झोडपले पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक  होता. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देवळी तालुक्यातील गिरोली येथे २०० मिलिमीटर, हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथे २४० मिलिमीटर, वाघोली २२५, सावळी २५२, कानदगाव २४६, अल्लीपूर २४०, सिरसगाव येथे २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com