सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ः सिंधुदुगमध्ये पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता. १८) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली. कापणीला आलेले भातपीक या पावसामुळे संकटात सापडले आहे.
जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. याचा जोर मंगळवारी (ता. १९) कायम होता. समुद्रही खवळला आहे. वादळसदृश स्थितीमुळे समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने मच्छीमारांना केले आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पूरजन्य स्थिती आहे.
देवबागमध्ये कर्ली खाडीच्या उधाणाचे पाणी घुसले. मालवण शहरात अनेक भागांत पाणी साचले. बागायत येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मसुरेमध्येही पाणी साचल्याने अनेक भागांत वाहतूक ठप्प झाली आहे. आंबेली पुलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्याचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. मुसळधार पावसामुळे भीतीचे वातावरण आहे.