वादळी पावसाचा दणका

वादळी पावसाचा दणका
वादळी पावसाचा दणका

पुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत सोमवारी विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार वादळी पावसाने दणका दिला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांना आणि फळबागांना फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने ऊसताेडणी व वाहतुकीसह गुऱ्हाळघरांवर परिणाम झाला आहे. वादळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. रब्बी पिकांसाठी मात्र हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.  कोल्हापूर शहर व जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून वादळी पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने ऊसतोडणीस बंद पडली. गूळ उत्पादन, नाचणी पीक काढणीची कामांवर परिणाम झाला. रविवार सायंकाळपासूनच सुरू झालेला पाऊस रात्री दोन ते चार वाजेपर्यंत सुरू होता. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाचा जोर अधिक होता. शेतात पाणी साचून राहिल्याने कारखान्यांची ऊसतोडणी बंद झाली. कोकणातील रत्नागिरीसह सिंधुदुर्गात पावसाने हजेरी लावली. भात आणि आंबा उत्पादकांना फटका बसला.  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहुतांशी गावात सोमवारी (ता. १९) पहाटे चार वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतामध्ये पाणी साचल्याने ऊस वाहतूक बंद करण्यात आली आहे. आटपाडी तालुक्‍यात सकाळी हलका पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. द्राक्ष बागेवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषध फवारणी करावी लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तालुक्यात वादळी पावसाने खरीप हंगामातील पिके पाण्यात गेली आहेत. काढणीस आलेल्या आणि काढणी सुरू झालेल्या पिकांचे या पावसाने नुकसान झाले. अनेक ठिकाणी गुऱ्हाळघरे आणि साखर कारखान्यांसाठी सुरू असलेल्या उसाच्या तोडी पावसाने बंद ठेवाव्या लागल्या. सातारा, कोरेगाव, जावली, महाबळेश्वर आदी तालुक्यांत ढगाळ वातावरण झाले होते. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली. नांदुरा, शेगाव, बाळापूर, तेल्हारा तालुक्यांतील काही गावांमध्ये हलक्या स्वरूपातील हा पाऊस झाला. या सरींमुळे सध्या शेतांमध्ये उभ्या असलेल्या तुरीच्या पिकाला हलकासा दिलासा मिळू शकतो. अचानक पाऊस अाल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यांतही रविवारी (ता. १९) मध्यरात्रीनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार तालुक्यांत तसेच नांदेड तालुक्याच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परिपक्वेतेच्या अवस्थेतील तूर आणि रब्बीतील ज्वारी, हरभरा पिकांना फायदा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, आंबेदिंडोरी, मोहाडी, जानोरी परिसरात तुरळक पावसाने तर पालखेड बंधारा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ऐन फुलोऱ्यावर आलेल्या द्राक्षबागांना फटका बसला असून पालखेड परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. किमान तापमानाचा पारा सकाळी अचानक चार अंशांनी घसरला. तर कमाल तापमानातही मोठी वाढ झाली. आकाशात ढग जमले होते. अखेर जिल्ह्यातील मनमाड, आंबेदिंडोरी, मोहाडी, जानोरी परिसरात बेमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. या परिसरात द्राक्ष शेतीचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे वाढलेल्या थंडीत अचानक ऊन आणि पावसाच्या कहरमुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पिंपळगाव बसवंतलाही तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले आहे. शिंदवड, खेडगाव, तळेगाव, सोनजांब परिसरात पावसाने अचानक हजेरी लावली यामुळे फुलोऱ्यातील द्राक्षबागां संकटात सापडल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com