फळबाग लागवडीत खोडा; उद्दिष्टपूर्ती कोसो दूर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत फळबाग लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा २ हजार ४६ शेतकऱ्यांना १ हजार ४४३.४५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. परंतु डिसेंबर अखेरपर्यंत नऊ पैकी चार तालुक्यातील केवळ ५८ शेतकऱ्यांनी ४०.६० हेक्टरवर लागवड केली आहे. खड्डे खोदूनही रोपे उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे फळबाग लागवड करता येत नाही. मजुरीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागला. विविध कारणांनी खोडा निर्माण होत असल्याने फळबाग लागवडीची उद्दिष्टपूर्ती अद्याप कोसो दूर आहे.

यंदा परभणी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत २ हजार ८०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २ हजार ३९३ शेतकऱ्यांनी १ हजार ८६४.७० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केलेले आहेत.

एकूण २ हजार ५८ शेतकऱ्यांना १ हजार ५०४.३५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ४४३.५ हेक्टर फळबाग लागवडीसाठी २ हजार ४६ शेतकऱ्यांच्या अर्जांना प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे, परंतु डिसेंबरअखेर केवळ ५८ शेतकऱ्यांनीच ४०.६० हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी परभणी तालुक्यात सर्वाधिक ३१.९० हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.

पाथरी तालुक्यात ५.८० हेक्टरवर, सोनपेठ तालुक्यात ०.५० हेक्टर, गंगाखेड तालुक्यात २.४० हेक्टर अशी एकूण ४०.६० हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. यामध्ये आंबा ११.५० हेक्टर, चिकू १ हेक्टर, पेरू १.९० हेक्टर, डाळिंब ३ हेक्टर, संत्रा १२.७० हेक्टर, मोसंबी १.६० हेक्टर, कागदी लिंबू ५.९० हेक्टर, सिताफळ ३ हेक्टर या फळपिकांचा समावेश आहे.

फळबाग लागवड प्रस्तावास मंजुरी मिळाली असली, तरी कमी पावसामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी आता फळबाग लागवडीसाठी इच्छूक नाहीत.

मनरेगाअंतर्गत मजुरीचे देयक वेळेवर मिळत नाहीत. अनेक ठिकाणी ग्रामरोजगार सेवक सहकार्य करत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मनरेगाअंतर्गत फळबाग लागवडीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, परंतु संबंधित शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता आहे. याची खातरजमा कृषी विभागाने करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी खालावत आहे. प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत आहे. येत्या काही दिवसांत अनेक तालुक्यांत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे फळबाग लागवडीसाठी मुदत देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही.

संत्रा आणि आंबा लागवडीसाठी गावातील २० शेतकऱ्यांनी खड्डे खोदून दोन महिने झाले, अजून रोपे उपलब्ध झाली नाहीत. मनरेगाचे मस्टर रद्द करण्यात आल्यामुळे मजुरी घरातून द्यावी लागल्याने भुर्दंड बसला आहे. रामेश्वर निर्वळ, शेतकरी, रुढी, ता. मानवत, जि. परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com