जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?

सात एकरांवरील डाळिंबाची दोन हजार झाडे पाण्यावाचून जळाली. दर वर्षी टॅंकरचे पाणी देत बाग जपण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. शेणखते, वरखते घालून ही बागा फुलवली आणि फळे लागण्याच्या वेळी पाणी कमी पडले. एक एकर लिंबाचीही तीच अवस्था आहे. बाग गेली तर होणारे नुकसान सहज भरून निघणार नाही. - मच्छिंद्र बाजीराव बोरुडे, शेतकरी, निंबोडीवाडी ता. श्रीगोंदा, जि. नगर.
फळबागा वाळल्या
फळबागा वाळल्या

नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या आहेत. अनेक वर्षांपासून फळबागा घरातल्या माणसाप्रमाणे जोपासल्या, पण आता पाणीच नाही, जगायच्या कशा अशी चिंता आता जिल्हाभरातील फलोत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. पाथर्डी, शेवगाव, जामखेड सह काही भागात तर विकत घ्यायची तयारी असली तरी टॅंकर भरायलाच पाणी नाही. त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आले आहेत. जिल्हाभरात मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू, संत्रा यांसह अन्य सुमारे चाळीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील फळबागांना दुष्काळाचा गंभीर फटका बसू पाहत आहे. ‘‘बागा गेल्या तर, होणारं नुकसान सहज भरून निघणार नाही’’ असे आता शेतकरी सांगू लागले आहेत.   नगर जिल्ह्यामधील काही भागाचा अपवाद वगळला तर सर्वच तालुक्‍यात यंदा गंभीर दुष्काळ आहे. उसाचा, बागायतदार पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या नगरच्या सर्वच तालुक्‍यांत गेल्या वीस वर्षांपासून फळबाग लागवड केली जात आहे. विशेषतः गेल्या दहा वर्षांपासून दुष्काळी भागात फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. सध्या जिल्हाभरात ८० ते ९० हजार हेक्‍टर फळबागांचे क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक डाळिंबाचे क्षेत्र असून मोसंबी, संत्रा, पेरू, कर्जत, श्रीगोंदा तालुक्‍यंत लिंबू, चिकू, संगमनेर, राहाता भागात केळी, पपईचे क्षेत्र आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फळबागांनी चांगला आधार दिला आहे.   गेल्या पाच वर्षांपासून मात्र फळबाग उत्पादक सातत्याने संकटात येत आहे. यंदा तर दुष्काळाने फळबाग उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी साठवण झाले नाही. त्यात परतीचा पाऊस आलाच नसल्याने पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. खरिपासह रब्बी पिकांना पाणीटंचाईचा फटका बसलाच, मात्र सर्वाधिक अडचण फळबागांची झाली आहे. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नेवासा, पारनेर, श्रीगोदा, संगमनेर भागात तर गेल्या अनेक दिवसांपासून विकतचे पाणी घेऊन फळबागा जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अजून सात महिन्यांचा कालावधी जायचा आहे. विकतच्या पाण्याने बागा जगवल्या जातीलही, पण टॅंकर भरायलाच आज अनेक भागात पाणी नाही. त्यामुळे यंदा बहार धरता आला नाही, उत्पादन तर निघणार नाहीच, पण गेल्या अनेक वर्षांपासून जीवापाड जपलेल्या बागा जगवायच्या कशा? अशी चिंता फलोत्पादकांना लागली आहे. आता बागा जळाल्या तर दुष्काळी भागात होणारे नुकसान सहजपणे भरून निघणार नाही अशी भावना श्रीरामपूर तालुक्‍यातील अतुल तांबे यांनी व्यक्त केली. 

सरकारी उपाययोजना कधी?   दुष्काळी भागातच फळबागांची संख्या अधिक आहे. फळबागा जगविण्यासाठी, सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी गेल्या अनके दिवासांपासून केली जात आहे. मात्र अजून तरी दखल घेतली नाही. मुळात सरकार दुष्काळी भागात उपाययोजना नेमक्‍या कधी करणार, फळबागांना जर अनुदान देणार असतील तर बागा जळाल्यावर देणार का असा प्रश्‍न फलोत्पादन उत्पादक उपस्थित करत आहेत.  प्रतिक्रिया माझ्याकडे सात एकरांवर डाळिंब, सीताफळ, मोसंबी, पेरूची झाडे आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून दर पाच दिवसाला अडीच हजार रुपये खर्च करून पाणी आणून झाडे जगवतोय. जवळपास पाणी नसल्याने नऊ किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. तसे देत असलेले पाणी पुरेसे नाही; पण झाडे जगायचा प्रयत्न करतोय. सरकारने काही फलोत्पादकांसाठी तातडीने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. - प्रदीप वाघ,  शेतकरी तिसगाव, ता. पाथर्डी, जि. नगर.

सध्या काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून बागा जगवाव्यात याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे. होणाऱ्या नुकसानीची खरी वस्तुस्थिती फेब्रुवारी, मार्चमध्ये कळेल. - विलास नलगे, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com