नवी दिल्ली ः देशात अागामी दोन वर्षांत साखर उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर साखरेच्या निर्यातीसाठी भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) शेजारील देशांबरोबरील होणाऱ्या द्विपक्षीय मुक्त व्यापार करारात साखरेचा समावेश करण्याची मागणी केली अाहे. याबाबत ‘इस्मा’ने वाणिज्य मंत्रालयाला सूचना केली अाहे.
देशात २०१८-१९ अाणि २०१९-२० या वर्षात अतिरिक्त साखर उत्पादन होणार असल्याचे संकेत मिळत अाहे. देशांतर्गत साखरेचे उत्पादन वाढल्यास स्थानिक पातळीवर साखरेच्या दरात घसरण होऊ शकते. यामुळे थकीत ऊसबिलाची समस्याही निर्माण होईल, असा दावा करत ‘इस्मा’ने साखर निर्यात वाढविण्याची गरज व्यक्त केली अाहे.
‘‘सध्या कृषी निर्यात धोरण तयार केले जात अाहे. त्यासाठी साखर निर्यात कशी वाढविता येईल, या मुद्द्यावर वाणिज्य मंत्रालयाने मते मागविली अाहेत. त्यावर इस्माने भारत अाणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार करारात साखरेचा समावेश करण्याची सूचना केली अाहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
बांगलादेशमधील रिफायनरींकडून भारतातील साखरेला प्राधान्य दिले जात अाहे. मात्र ब्राझीलमधील स्वस्त साखरेशी अाम्ही स्पर्धा करणे अशक्य अाहे, असे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे.
साखर निर्यातीसाठी हवे योग्य धोरण
भारत अाणि श्रीलंकादरम्यान मुक्त व्यापार करारामुळे साखर निर्यातीला फायदा होणार असल्याची अाशा व्यक्त करण्यात अाली अाहे. भारताचा चीन अाणि इंडोनेशियाबरोबरचा व्यापार प्रतिकूल स्थितीत अाहे. चीन अाणि इंडोनेशिया हे जगातील मोठे साखर खरेदीदार देश अाहेत.
या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांत साखर निर्यातीसाठी योग्य असे देवघेव धोरण राबविण्याची गरज ‘इस्मा’ने व्यक्त केली अाहे. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल जागतिक बाजारपेठेत पोचावा यासाठी निर्यातीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे यापूर्वी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले अाहे.