मराठवाड्यात पावसाच्या ओढीने वाढली चिंता

मराठवाड्यात पावसाच्या ओढीने वाढली चिंता
मराठवाड्यात पावसाच्या ओढीने वाढली चिंता

औरंगाबाद : पावसाच्या ओढीने मराठवाड्यातील खासकरून औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. परतीचा पाऊस अजून कृपाशील न झाल्याने खरिपाच्या पिकात शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेल्या सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादकतेविषयी स्पष्टता होणार आहे.

मराठवाड्यात २२ ऑगस्टनंतर पावसाने दिलेली ओढ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. तुरळक ठिकाणी हलका, तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असला तरी परतीच्या पावसाचीही अजून सार्वत्रिक हजेरी लागली नाही. त्यामुळे रब्बीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मराठवाड्यातील जवळपास तेरा तालुक्‍यात वार्षिक अपेक्षेच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामुळे अशा तालुक्‍यांमधील पिकांची अवस्था बिकट बनली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व खुल्ताबाद, नांदेड जिल्ह्यांतील देगलूर, बीड जिल्ह्यांतील बीड, आष्टी, गेवराई, शिरूर कासार, धारूर, लातूर जिल्ह्यांतील औसा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, भूम, परंडा आदी तालुक्‍यांचा समावेश आहे.

अपेक्षेच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा किंचित जास्त ५५ टक्‍क्‍यांच्या आत पाऊस झालेल्या तालुक्‍यांची संख्याही बरीच असल्याने येत्या काही दिवसांत परतीचा पाऊस कृपावान न झाल्यास दुष्काळसदृश्‍य असलेली मराठवाड्यातील बहुतांश तालुक्‍यातील स्थिती अधिक भीषण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

अशीच स्थिती कायम राहिल्यास खरिपाची पीक हातची गेली असताना रब्बीचीही आशा नसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आपल्या फळबागा वाचविण्याचे व पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com