भारतातून केवळ ०.२ टक्के डाळिंब निर्यात
भारतातून केवळ ०.२ टक्के डाळिंब निर्यात

भारतातून केवळ ०.२ टक्के डाळिंब निर्यात

सांगली : भारतात डाळिंबाच्या उत्पादनापैकी केवळ नाममात्र डाळिंबाची निर्यात होते, त्यामुळे निर्यात वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, मागर्दशन करण्याची गरज आहे, तरच डाळिंबाच्या निर्यातीची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. देशातून केवळ ०.२ टक्के डाळिंबाची निर्यात होते. यंदा निर्यातीची टक्केवारी घसरली आहे. युरोपमध्ये डाळिंबाची निर्यात करायची असेल, तर त्यासाठी रासायनिक औषधांमध्ये युरोपियन युनियनमध्ये होणारे बदल याची शासन आणि कृषी विभागाने वेळच्या वेळी माहिती शेतकऱ्यांना दिली पाहिजे. मात्र, याची माहिती शासन आणि कृषी विभाग देतच नाहीत. त्यामुळे आठ वर्षे निर्यात करणारे डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीपासून वंचित राहिले आहेत. यामुळे युरोपियन युनियनमध्ये होणारे बदल आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी शासन आणि कृषी विभागाने पुढाकार घेतला पाहिजे.

देशात डाळिंबाचे एकूण सुमारे १ लाख २८ हजार ७१० हेक्‍टर क्षेत्र आहे. डाळिंबाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता १५ ते १८ टन इतकी आहे. गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. भारतातून डाळिंबाची अधिक निर्यात होऊ शकते. यासाठी केंद्र सरकाने पुढाकार घेतला पाहिजे. सध्या युरोप, गल्फ कंट्री याठिकाणी डाळिंबाची निर्यात होते. वास्तविक पाहता भारतातून डाळिंबाची केवळ ०.२ टक्के निर्यात होते. डाळिंबाच्या निर्यातीला खूप मोठ्या संधी आहेत. पण पायाभूत सुविधा मिळत नसल्याने डाळिंबाची निर्यात वाढण्यास मदत होत नाही. त्यामुळे यंदा डाळिंबाची निर्यात कमी झाली आहे. सध्या निर्यातक्षम डाळिंबास १०० ते १४५ रुपये प्रतिकिलोस असा दर मिळतोय.

निर्यातक्षम डाळिंबासाठी हवे मार्गदर्शन निर्यातक्षम डाळिंब वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शासन, संघाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या गटाची स्थापना केली पाहिजे. यामाध्यमातून प्रत्येक गावात मार्गदर्शन केले पाहिजे, तर दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेणे शक्‍य आहे. पण तसे होतना आजतरी दिसत नाही. डाळिंब संघातर्फे निर्यातक्षम डाळिंबासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले; मात्र शेतकऱ्यांपर्यंत कोणतीच माहिती दिली जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

डाळिंबाची निर्यात करत असताना अपेडाने बदललेले नियम सांगितले पाहिजेत. त्यानुसार डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी मदत होईल. डाळिंबाची निर्यात वाढविण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे. - शहाजी जाचक, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र  डाळिंब उत्पादक संघ, पुणे

‘निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी संघ आणि कृषी विभागाने कार्यशाळा घेतली पाहिजे, तरच डाळिंबाची निर्यात अधिक होईल. कृषी विभाग इतर योजना पूर्ण करण्यातच व्यग्र असतो. त्यामुळे कृषी विभाग डाळिंब या पिकासाठी कोणतेच धोरण आमच्यापर्यंत पोचवत नाही.’ - बाबासाहेब पाटील, डाळिंब उत्पादक शेतकरी, आटपाडी, जि. सांगली

    आम्ही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ग्रीन व्हॉरिझन फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. डाळिंबाची थेट युरोपला मध्यस्थाशिवाय निर्यात सुरू केली. याचा अभ्यास आम्ही स्वतः केला. युरोपला डाळिंबाची यशस्वी निर्यात केली आहे. याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. - अंकुश पडवळे,  संचालक, ग्रीन व्हॉरिझन फार्मर प्रोड्युसर कंपनी, पंढरपूर

​राज्यातील क्षेत्र  (हेक्‍टरमध्ये)

 राज्य   क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
 महाराष्ट्र   ९० हजार
 कर्नाटक  १६ हजार ६२०
 गुजरात  ९ हजार ३८०
 आंध्र प्रदेश  ६ हजार
 तेलंगण   १ हजार ७३०
 मध्य प्रदेश   २ हजार ३८०
 तमिळनाडू   ४००
 हिमाचल प्रदेश  २ हजार २००
 एकूण  १ लाख २८ हजार ७१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com