पोलिस आयुक्तांना भेटूनही गैरव्यवहाराचा तपास पुढे सरकेना

पोलिस आयुक्तांना भेटूनही गैरव्यवहाराचा तपास पुढे सरकेना

पुणे : राज्यात झालेल्या कृषिसेवक भरती गैरव्यवहाराच्या विरोधात कृषी आयुक्तालयाच्या तक्रारीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाचे काय झाले हा प्रश्न राज्यभर अजूनही चर्चेत आहे. चौकशीसाठी पोलिसांकडून पावले टाकली जातील, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले होते; मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.   राज्यात झालेली कृषिसेवक परीक्षा वादग्रस्त ठरल्यामुळे ७३० उमेदवारांची निवड यादी शासनाने रद्द केली होती. तसेच ही भरती भारांकन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मात्र, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात मॅटने भारांकन भरतीच्या विरोधात निकाल दिला व आधीची निवड यादी कायम केली होती. कृषिसेवक भरतीमध्ये लाखो रुपये उकळल्याचा संशय आहे. तसेच शासनाने घेतलेल्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार कृषी आयुक्तालयानेच केली आहे. आयुक्तालयाचे आस्थापना विभागाचे सहसंचालक सुधीर ननावरे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या विरोधात लेखी मुद्दे पोलिसांना दिल्यानंतर गुन्हा दाखल होता. मात्र, गुन्हाचा तपास संशयास्पदरीत्या रेंगाळला आहे.   या गैरव्यवहाराचा तपास वेगाने होण्यासाठी काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. विक्रम गायकवाड, परीक्षार्थी दत्ता वानखेडे तसेच सचिन थोरात यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेतली होती. ‘‘या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालू शकत नाही. मात्र, सहायक पोलिस आयुक्त याबाबत माहिती घेऊन तपासाला योग्य दिशा देतील, असे आयुक्तांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही,’’ अशी माहिती श्री. वानखेडे यांनी दिली.  ‘‘या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे राज्य सरकारनेच विधिमंडळात सांगितले आहे. त्यामुळेच परीक्षा परिषदेच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा निकाल देताना एका गोपनीय समितीचा अहवाल ग्राह्य धरण्यात आला. मात्र, ही समितीच वादग्रस्त आहे. कारण, फौजदारी गुन्हा दाखल असलेल्या परीक्षा परिषदेचे तीन अधिकाऱ्यांचा समावेश या समितीत होता,’’ असे श्री. वानखेडे यांनी पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.  काही परीक्षार्थींच्या म्हणण्यानुसार, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि एजंट मंडळींनी ११६ उमेदवारांना स्वतःच्या उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याच्या किंवा मोजकीच उत्तरे लिहिण्याच्या सूचना दिल्या होत्या. परीक्षा झाल्यानंतर १५६ परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीज एजंटांनी जमा करून नष्ट केल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयास्पद उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अजूनही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत झालेली नाही, असेही पोलिस आयुक्तांना सांगण्यात आले.  आस्थापना विभाग व परिषदेची मिलीभगत  कृषिसेक भरतीमधील गैरप्रकाराच्या विरोधात सर्वात जास्त गोपनीयता कृषी आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाने पाळली आहे. कारण याच आस्थापना विभागाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या बाजूला कृषी आस्थापना विभाग व परीक्षा परिषदेने आतून एकत्र येत गैरव्यवहार नसल्याचे भासविले आहे. त्यासाठी एक गोपनीय चौकशी समिती तयार केली गेली. या समितीने घोटाळेबहाद्दरांना ‘क्लीन चिट’देखील दिल्याचे उघड झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com