यवतमाळ ः विषबाधाप्रकरणी नेमलेली चौकशी समिती निव्वळ फार्स असून, १८ लोकांचे बळी गेल्यावरही सरकार कंपन्या आणि कृषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करू शकत नाही, हा प्रकार दुर्दैवी अाहे, असा अारोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी (ता. ८) केला.
विषबाधाप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी राष्ट्रवादीकडून मृतांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची तत्काळ मदत जाहीर करण्यात आली.
शासकीय विश्रामगृहावर धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी माजी आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, आमदार मनोहर नाईक, जिल्हा परिषद सभापती निमिष मानकर अादी उपस्थित होते.
श्री. मुंडे म्हणाले, की कापूस लागवड क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे आर्थिक फायद्यासाठी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बिटी बियाणे विकले गेले. अशा विक्रेत्यांवर हंगामापूर्वी कारवाई झाली नाही. त्याच बोगस बियाण्यांवर आज कीडरोग वाढला. त्याच्या नियंत्रणाकरिता आता बोगस कीडनाशकांची फवारणी झाली. या दोन्ही घटनांना मुख्यत्वे कृषी विभाग तसेच कीटकनाशक उत्पादक कंपन्या जबाबदार आहेत. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदनाबाहेर आणि सदनाच्या आतदेखील पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषिमंत्री विदर्भाचे असताना त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात येऊन काही तरी ठोस कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी पर्यटनासारखाच हा दौरा पूर्ण करत भेटीची औपचारिकता साधली. मुख्यमंत्र्यांनीदेखील जिल्ह्यात येणे अपेक्षित आहे; मात्र त्याकरिता अद्याप त्यांना मुहूर्त गवसला नाही. ऑनलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारने जेरीस आणले आहे. हे सरकार ऑफलाइन होईपर्यंत ऑनलइनचा हा फेरा सुटणार नाही, असा टोमणाही श्री. मुंडे यांनी मारला.
ऑनलाइन आणि डिजिटल असल्याचा दावा करणाऱ्या सरकारने त्यांच्या खात्यात ही मदत पोचती करणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही, असे श्री. मुंडे यांनी सांगितले.