सांगली : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी उपलब्ध असून, सातत्याने विद्युत खंडित होत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी अडथळे निर्माण होऊ लागले आहे. याचा फटका उन्हाळी पिकांना बसू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्याला कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी शेतीला वापरले जाते. सध्या दोन्ही नदीत पाणी मुबलक आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी, महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतीपंपाच्या विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करसत करावी लागते आहे. उसाबरोबर केळी, भाजीपाला पिकासह इतर पिकांच्या वाढीवर परिमाण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिके दुपार धरू लागली आहेत. भाजीपाला, फळभाज्या त्याचबरोबर उसाच्या खोडवा पिकांवरही उन्हाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यांची वाढ खुंटू लागली आहे. याकाळात वाढत्या भारनियमनांचा फटका बसत आहे.
मुळात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा चार दिवस सकाळी आणि तीन दिवस रात्रीच्या वेळी होतो आहे. त्यातच महावितरणाकडून सातत्याने वीज खंडित होते आहे. शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीशी संपर्क केला असता कंपनीचे अधिकारी सांगतात, की फीडरवर अतिरिक्त दाब आल्याने वीजपुरवठा आपोआप खंडित झाला आहे. सुमारे एक ते दोन तास वेळ लागेल. मुळात दहा तास मिळणारी वीज सात ते आठ तास मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
उन्हाच्या तीव्रतेने शेतजमीन तापल्याने पाटाने सोडलेले पाणी पुढे न सरकल्याने पुन्हा पाणी तिथेच जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची किरकोळ टंचाई जाणवत आहे.