जळगावमधील तीन हजार रोहित्रांचा वीजपुरवठा केला खंडीत

कपाशीचे पीक पुरते खराब झाल्याने अर्थकारण कोलमडले आहे. त्यात आता तीन हजार रुपयांसाठी वीज कंपनी वीज खंडित करून वेठीस धरीत आहे. शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रकार शासन करीत आहे. - अरुण आसाराम जाधव, शेतकरी, डोमगाव, जि. जळगाव.
जळगावमधील तीन हजार रोहित्रांचा वीजपुरवठा केला खंडीत
जळगाव ः थकबाकी वसुलीसाठी कृषिपंपांना वीजपुरवठ्यासाठी शेतशिवारांमध्ये उभारलेल्या सुमारे तीन हजार रोहित्रांचा वीजपुरवठा मुख्य वीज वाहिनीवरूनच महावितरणने बंद केला आहे. यामुळे कृषिपंप बंद झाले असून, सिंचनाचे काम ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 
 
शुक्रवारपासून (ता.२२) कृषिपंप वीज तोडणी मोहीम सुरू झाली. याबाबत कुठलीही सूचना दिली गेली नाही. जळगाव व धरणगाव तालुक्‍यात शुक्रवारी सकाळीच वीज कंपनीचे कर्मचारी शिवारांमध्ये आले. त्यांनी मुख्य वाहिन्यांवरून रोहित्रांना होणारा वीजपुरवठा बंद केला. रोहित्रच बंद झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद झाला. एका गावाच्या शिवारात सुमारे चार कर्मचाऱ्यांनी ही वीज तोडणी मोहीम राबविली.
 
विशेष म्हणजे सध्या सकाळी वीज मिळत असल्याने शेतकरी सिंचनासाठी शेतात केले होते. याच वेळी कर्मचारी कुठलीही सूचना न देता थेट रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करू लागले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पाचोरा, पारोळा, यावल तालुक्‍यांतही काही भागात हे वीज तोडणीचे प्रकार झाले आहेत. शनिवारीही (ता.२३) ही मोहीम राबविली. 

कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जोपर्यंत तीन हजार रुपये भरणार नाहीत, तोपर्यंत वीज सुरू होणार नाही, असे निर्देश वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. त्यासाठी विजबिल भरण्याची सुविधा रविवारीही (ता.२४) वीज कंपनीच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये देण्यात आली. जळगाव शहरात कोंबडी बाजारनजीकच्या कार्यालयात ही व्यवस्था केली होती. 

वीज सूचना न देता का तोडली, अशी विचारणा ज्या वेळी वीज कंपनीच्या जळगावमधील कार्यालयात व काही जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधून केली त्या वेळी त्यांनी आम्हाला वरून आदेश आले आहेत. आम्ही काहीही करू शकत नाही, असे सांगून किमान तीन हजार रुपये भरा व वीजपुरवठा सुरू करून घ्या, असे स्पष्ट केले. आजघडीला ज्या शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही ते शेतकरी अडचणीत आले आहेत. 
 
सूचना न देता कृषिपंपांची वीज बंद केल्याचा मुद्दा काही शेतकऱ्यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी सांगितला. या शेतकऱ्यांना राज्यमंत्री पाटील यांनी बागायतदारांना तीन हजार रुपये रक्कम मोठी नाही. भरून टाका, असे सांगून आपण काहीही करू शकत नाही, असे सांगत असमर्थता दाखविली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com